नवी दिल्ली, दि. 13- नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे.
अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणे आणि सेवा करणे हे राजकीय व्यक्तीचे काम असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गृहमंत्री शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी आल्याचा दावा एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला आहे.
देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु, सद्य सरकार मात्र यात अपयशी ठरत असल्याचे दिसते. त्यामुळे “एएसयूआय’ने गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असेही एनएसयूआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.