पणजी – करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
अशातच गोव्यातील बांबोळी येथील सर्वात मोठ्या सरकारी इस्पितळात ऑक्सिजनचा नीट पुरवठा होत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास २६ जणांनी प्राण सोडले असताना बुधवारीही पहाटे देखील दोन ते सहा या वेळेत २१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्रवतारच घेतला आहे. प्रचंड वेगाने होत असलेल्या संसर्ग आणि अपुऱ्या पडत असलेल्या आरोग्य सुविधा, यामुळे देशात अनेक करोनाबाधितांचे प्राण जात आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यूंची नोंद होत आहे. त्यातच गेल्या २४ तासात देशात करोनाबळींची संख्या नकोशा उच्चांकावर पोहलची आहे.
विविध राज्यांनी लावलेला लॉकडाउन, कडक निर्बध लावले असले तरी करोना संसर्गाचे थैमान अजूनही नियंत्रणात आलेले नाही. देशात दररोज साडेतीन ते चार लाखांच्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांतील म्हणजे मंगळवारची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली असून, करोनावर मात करून परतलेल्या रुग्णांची संख्या वगळता चित्र फारसे आशादायक नसल्याचेच आकडेवारीतून दिसत आहे.