पाबळ – गेल्या एक वर्षांपासून राज्यात सुरू असलेल्या करोनाच्या धुमाकुळात राज्य शासनाने दारू विक्रीवरील बंधने उठवून मुक्त केली आहेत. त्यावेळी दूध व दुग्धजन्य पदार्थही अत्यावश्यक सेवेत होते. गोरगरिबांना त्याचा लाभ घेता येत होता. आता करोनाच्या दुसऱ्या लाटेत दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मात्र बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे दूध अत्यावश्यक सेवेतून हद्दपार करण्यात आले असून दारूवरील बंधने मात्र हटवण्यात आली आहेत.
दरम्यान दूध हे पूर्ण अन्न आहे. इतर पदार्थांमध्ये पनीर, ताक, दही हे पदार्थ प्रोटीनवर्धक असताना, मागील लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात विकले जात होते. आता मात्र या व्यवसायावर बंधने आली आहेत. यासाठी दूध विक्री हा शब्द परिपत्रकातून हटवण्यात आला असून दूध संकलन असा उल्लेख करण्यात आला आहे.
याबाबत माहिती घेतली असताना दूध संकलनाच्या वेळेतच विक्री करावी असे सुचवण्यात आले आहे. तर बारामती येथील निर्बंधांप्रमाणे घरोघरी दूध विक्री करा असे सांगितले जात आहे. तर अशा आदेशात ग्रामीण व शहरभाग हा प्रकारच संपवण्यात आला आहे. करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्यासाठी ग्रामीण भागात पावले उचलली जात आहेत. यात छोटे मोठे व्यावसायिक भरडले जात असताना आता अत्यावश्यक सेवेतील दूध विक्रीवर बंधने आली आहेत.
त्यातही दूध विक्रेत्यांसाठी स्पष्ट सूचना नसल्याने ते संभ्रमात पडले आहेत. नवीन निर्बंध सुरू होण्याअगोदरच कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला असून पोलिसांकरवी व्यावसायिकांवर आर्थिक भुर्दंड लावण्यात येत आहे. ग्रामीण भागात पहिले निर्बंध 15 मे पर्यंत लागू असताना आता 10 मे पासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये दोन तास अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात आले आहेत, मात्र यामध्ये किराणा, भाजीपाला यावरही निर्बंध टाकण्यात आले आहेत.
मात्र त्याची अंमलबजावणी 8 तारखेपासूनच पोलिसांमार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नवीन बंधने सुरू करताना ग्रामस्थांना अत्यावश्यक गरजांची खरेदी करण्यासाठी अगोदर दोन दिवस वेळ देणे गरजेचे होते. परंतु तसे न करता बंधने कडक करण्यात आली आहेत. यामुळे पुढील दहा दिवसांत ग्रामीण भागात आता डाळ, तांदूळ, मीठासाठी नागरिकांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे.