श्रीनिवास वारुंजीकर
“कवितानिर्मिती ही गोष्टच वेगळी आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते. पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्याने, कवीच्या सर्व पेशींचा, एकत्रित सत्त्वयुक्त ऐवज, त्या कवितेच्या अंगाखांद्यात निर्माण झालेला असतो आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून उणा झालेला असतो…’ स्वत:च्या कवितेविषयी इतकी कमालीची काव्यनिष्ठा बाळगणारा हा कवी ग्रेस म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे. त्यांच्या आज दि. 10 मे रोजी सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या जन्मदिनानिमित्त एक अमूर्त चिंतन…
“कविता ही कोणाला कधीच वारसाहक्काने मिळत नसते. ती अल्पांशाने कसलीही मिळकत नसते आणि कविता हे कमाईचे साधनही नसतेच. माझी कविता ही मलाही संपूर्णपणे समजते, असे अजिबात नाही. रूपकाची उभारणी आणि रुपकाची बांधणी, यातून प्रसरणशील प्रतिमांचे आणि प्रतिकांचे, संघातच्या संघात, माझ्या कवितेतून निर्माण होत असतात. कुठल्याही एकट अलंकाराच्या मदतीने, माझ्या कवितेत गतिलय आणि स्थितिलय निर्माणच होत नाही. शब्दांचे जिथे विसर्जन झाले आहे, तिथेच ही रुपकाची पाझरणी झुळूझुळू वाहू लागते आणि शब्दांचे विसर्जन होऊन, काव्याचा अर्थातीत अनुभव सुरू होतो…’ ग्रेस बोलत होते. जिथं कवीची, स्वत:च्या काव्यनिर्मितीबाबत इतकी स्पष्ट भूमिका आहे, तर मग या कवितेला दुर्बोध म्हणणार तरी कसं? कवी स्वत: जिथं सांगतोय की, ही कविता म्हणजे अर्थापलीकडचा अनुभव घेण्याची प्रक्रिया आहे, तर, कविता कळत नाही, ही तक्रार घेऊन कवीकडे जाता येणार नाही.
ग्रेस यांच्या सृजनप्रक्रियेत जगाचा पसारा नीटपणे मांडून ठेवलेला असायचा. सोबतीला जास्त काळ दु:खाचा काळोख असायचा, ज्याचा आरंभ संध्याकाळच्या संधीप्रकाशाने झालेला असायचा. उजेडही नाही आणि अंधारही नाही, अशी तिन्हीसांजेची, अर्थात संध्याकाळची वेळ, ही माणसांची वेळ नसते, असे आपल्याकडे मानले जाते.
ही प्राचीन शक्तींच्या जागरणाची वेळ असते. त्या वेळेच्या विजेसारख्या संधीरेषेवर ग्रेस उभे राहिले आणि मग त्यांनी निर्मितीशक्तीला आवाहन करणारा कवितेचा बीजमंत्र उच्चारला. मग धुसर वातावरणातून त्यांच्याकडे एक विलक्षण दु:खदग्ध असं आकारविहीन, विकारशरण असं अर्थसंचित चालत आलं. या संचितानं ग्रेस यांच्या कपाळावर आपली रक्तखूण उमटवली. हाच त्यांना मिळालेला प्रतिभेचा वर आणि शापही होता. मग काव्यनिर्मितीचा झंझावात आयुष्यभर त्यांच्याभोवती गरगरत राहिला. कळणं आणि न कळणं याच्यातली सीमारेषा संधी प्रकाशाप्रमाणे अंतर्धान पावली आणि खऱ्या अर्थाने काळावर ठसा उमटवणारा कवी जन्माला आला, तो ग्रेस.
निर्मितीप्रक्रिया आणि आत्मशोध ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. ज्यावेळी ग्रेसची कविता कळत नाही, समजत नाही असे आपण म्हणतो, तेव्हा कवितेमधले संदर्भ उकलण्यासाठी, आपण कवीच्या-ग्रेसच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो. पण तिथेही फारसं काही गवसत नाही. तेव्हा या कविता मग अंधार कोठड्या बनून राहतात की काय, असे वाटू लागते. त्यावर ग्रेस सांगतो की, प्रत्येक प्रतिभावंत कवी, आपल्या निर्मिती प्रक्रियेत आणि अनुभवविश्वातही एकदा तरी, आत्मशोधाच्या टप्प्यावर येतो. भयभीत होतो. त्यावेळी त्याचे भावविश्व, अनुभवविश्व आणि त्याची निर्मिती प्रक्रिया हे एकमेकांसमोर, जन्मोजन्माचे दावेदार असल्यासारखे उभे ठाकतात. याच टप्प्यावर कवीने अत्यंत प्रामाणिकपणे भाषेचा, शब्दांचा हाकारा ऐकायचा आणि फक्त व्यक्त व्हायचे असते. त्यात कसलाही अभिनिवेश आला तर पाण्यासारख्या पारदर्शक कवितेचे पावित्र्य भंग पावते. अगदी सगळी निर्मितीप्रक्रियाच नासून जाते.
आपली निर्मितीप्रक्रिया आणि आशयसंपन्नता याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या या कवीने मानवी दु:खाचे अभिजात शिल्प खोदण्याचे काम अव्याहत आणि निरंतर केले. त्याच्या शब्दांनी वाचणाऱ्यांच्या मनात विश्वव्याकुळता पेरली.
ग्रेसच्या कवितेने मानवी भावनांना थेट काळजात भिडवण्याचे सामर्थ्य दिले. त्याच्या शब्दांचे अर्थवाहीपण इतके प्रवाही असायचे-आहे, की शब्द वितळले तरी अर्थापलीकडचे भावनांचे आकाश भरून जायचे. म्हणूनच ग्रेसच्या कवितेवर अंधारव्रताची समई सतत तेवत असायची. अत्यंत डोळसपणे सूर्यास्ताचे सांजभय ग्रेसच्या कवितेचे बोट धरून चालत असे. ग्रेस म्हणतो की, “कविता लिहिणे म्हणजे इंचाइंचाने मरणे, प्रत्येक कवितेगणिक आणि शेवटी उरणारा कवीच्या देहाचा सांगाडा म्हणजे सोलून, सोलून नक्षीदंत झालेले देहतत्त्वाचे एक सुभाषितच!’
मी रहस्य शरणार्थी आहे, असे ग्रेस नेहमी मोठ्या अभिमानाने म्हणत असे. ग्रेस स्वत:ला “फेमिनाइन पोएट’ असंही म्हणवून घेत असे. मात्र त्यांच्या कवितेतले स्त्रीत्व हे स्त्रीत्वाच भांडवलही नाही किंवा तक्रारखोरही नाही, ते स्त्री-पुरुष भावनेच्या पलीकडे जाणारे वैशिष्ट्य आहे, असंही ग्रेसनी सांगितल आहे.
म्हणूनच ग्रेसची कविता हा केवळ शब्दांचा खेळ नव्हता. प्रतिमा-प्रतिकांची आरास म्हणजे ग्रेसची कविता नव्हती तर अतर्क्य, अनाकलनीय, अपरंपार सुंदर असे भावविश्व म्हणजे ग्रेसची कविता आहे. प्रत्येक कवितेचा भाव काळजापर्यंत पोहोचवण्याची क्षमता या कवितेत आहे. त्यामुळेच कळत नसली तरी ही कविता तुम्ही-आम्ही मनात जपली आहे. म्हणूनच मराठी भाषेच्या काव्यव्यापाराचा वेध घेताना ग्रेसला वगळून किंवा वळसा घालून कोणालाही जाता येणार नाही.