विनिता शाह
करोनासंबंधी काम करणाऱ्या सरकारी तज्ज्ञांच्या गटाने करोना लाटेबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. करोनाची संख्या भविष्यात आणखी वाढू शकते आणि आटोक्याबाहेर राहू शकते, असे समितीने म्हटले आहे.
नजिकच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक दररोज 1.25 लाख लोकांना बाधा होऊ शकते आणि या राज्यात रुग्णवाढीचा उच्चांक नोंदला जाऊ शकतो. तसेच महाराष्ट्र एक लाखाच्या रुग्णांसह दुसऱ्या स्थानावर राहू शकतो, असे समितीने म्हटले आहे. राजधानी दिल्लीतील आकडे दररोज 60 हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. भीतीदायक गोष्ट म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची उपलब्धता ही कमीच राहू शकते. समितीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अर्थात दररोज तज्ज्ञांकडून येणारे इशारे पाहता भविष्यातील स्थिती ही कल्पनेपलीकडची राहू शकते.
सक्रिय रुग्णांची संख्या 40 ते 45 लाख राहू शकते असा गर्भित इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ही स्थिती 14 मे ते 18 मे याकाळात राहू शकते, असे म्हटले आहे. सध्याचा काळ हा रुग्णसंख्येच्या बाबतीतील उच्चांकीचा काळ देखील मानला जात आहे. निती आयोगाचे सदस्य आणि करोनासंबंधी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यात म्हटले की, येत्या काही दिवसांत दररोजच्या रुग्णवाढीची संख्या ही पाच ते सहा लाख होऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते, देशात कोविड हा अतिशय उच्चांकी पातळीवर राहील तेव्हा भारतात 7 ते 8 लाख दररोज रुग्ण नोंदले जातील, असे सांगण्यात आले आहे. हे तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ आपापल्या क्षेत्रांत मातब्बर व्यक्ती मानल्या जातात. सध्याचे आकडे पाहता तज्ज्ञांनी सांगितलेले आकडे धक्कादायक आहेत.
करोनाच्या उद्रेकाचा विचार केल्यास आपली आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था होईल आणि चालू महिन्यात उद्रेक होत असेल तर सर्वसामान्य नागरिक, बाधित व्यक्तीची कशी अवस्था होईल, याचा विचार केला तर काळाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात आपण 30 ते 35 हजार व्हेंटिलेटर तयार केले होते आणि ही संख्या आता पुरेशी ठरत नाही. यापेक्षा कितीतरी पटीने उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, फ्रान्स, आयर्लंड, रुमानिया, आखाती देशातून भारताला व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरावठा केला जात आहे.
ऑक्सिजन जनरेटर प्लांट, सिलेंडर, कॉन्सट्रेटर देखील पाठवले जात आहेत. सुमारे 40 देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने 2004 च्या नियमात बदल केला आहे.
डिसेंबर 2004 मध्ये डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार भारत कोणत्याही देशाकडून मदत घेऊ शकत नाही. कारण भारताकडे आत्मनिर्भर होण्याची क्षमता आणि प्रतिभा आहे. केंद्र सरकारच्या सूत्रानुसार, परदेशातून येणारी मदत भारत सरकार खरेदी करत आहे. देशातील अतिरिक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांत गूगल, मायक्रोसॉफ्ट आदींच्या व्यवस्थापनांनी देखील आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
चीनकडून देखील 800 व्हेंटिलेटर येत आहेत. या आधारे करोना महासाथीच्या काळात भारत एकटा नसल्याचे सिद्ध झाले आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय बाजाराकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफने देखील भारताला मदत करण्यासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. सुरुवातीच्या काळापासून भारताला अनेक देशांनी औषध आणि लशीची मदत केली आहे.
जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरू असला तरी विश्लेषकांच्या मते, बाधितांचे आकडे दररोज सात ते आठ लाखांनी वाढले तर रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय सहायक कर्मचारी कोठून आणणार? हा स्रोत कोणताही देश पाठवू शकत नाही. कारण त्यांच्या अडचणी जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यांच्यावरही करोनाने घातक वार केले आहेत.
डॉक्टर आणि परिचारिकांना कोणताही पर्याय नाही. सध्याही प्रसिद्ध डॉक्टरांच्या सार्वजनिक संवादाच्या माध्यमातून करोनाच्या भविष्यातील भयावह स्थितीचे आकलन झाले आहे. आता येत्या काहीच दिवसांत रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती अधिक बिघडू शकते. आयसीयूमध्ये रुग्ण स्वत:ला अधिक सुरक्षित समजतात. कारण उपचार व्यवस्थेत आयसीयू सुविधा उच्च मानली जाते. आयसीयूमध्येच परिचारिका अधिक लक्ष ठेवतात. परंतु आपल्याकडे परिचारिकेबरोबरच डॉक्टरांची देखील टंचाई आहे. प्रख्यात डॉ. देवीप्रसाद यांच्या मते सध्या आपल्याला आणखी 80 हजार आयसीयू बेडची गरज आहे.
भारतात सध्या सुमारे 75 हजार ते 90 हजार बेड असून ते भरलेले आहेत. म्हणजेच तेथे कोविड आणि अन्य रुग्ण उपचार घेत आहेत. ही स्थिती पाहता देशभरात आणखी पाच लाख आयसीयू बेडची गरज भासणार आहे. कोविड रुग्णांना केवळ बेडच नाही तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची देखील तितकीच गरज आहे. अर्थात डॉ. प्रसाद यांनी म्हटले की, संभाव्य स्थिती पाहता देशभरात सुमारे 2 लाख परिचारिका आणि दीड लाख डॉक्टर नियुक्त करणे गरजेचे आहे. एवढे मोठे मनुष्यबळ कोठून आणणार असा प्रश्न आहे.
यासंदर्भात काही सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. आयसीयूमध्ये पीपीई किटचा पेहराव करून काही युवक सेवा देऊ शकतात. यानुसार नर्सिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुली-मुलांची भरती करता येणे शक्य आहे. त्यांना कोविड आयसीयूमध्ये एक वर्षासाठी नोकरी करण्याचा करार करावा. त्यानंतर त्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात यावी.
ज्या युवकांनी परदेशातील विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षणाची पदवी मिळालेली नसेल, अशा युवकांची देखील सरकारने नियुक्ती करायला हवी. कारण पाच वर्षांच्या अभ्यासाच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण मिळालेले असते.
अर्थात हे प्रयत्न किती यशस्वी होतील हे आताच सांगता येणार नाही. या आघाडीवर सरकार किती आणि कसे काम करेल यावर सर्वकाही अवलंबून असेल. सध्या करोनाच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी आपण व्यक्तिश: पातळीवरही सज्ज राहणे गरजेचे आहे. डॉ. वली, डॉ. कौशल कांत आणि रवी मलिक यासारख्या नामवंत डॉक्टरांनी तिसऱ्या, चौथ्या लाटेचेही भाकित केले आहे.