नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. रोज लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशी परिस्थिती समोर असताना देखील लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली नसल्याचे दिसत आहे. कारण अशा निष्काळजीपणामुळे लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागल्याची घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून समोर आली आहे.
जिल्ह्यातील खीरवा गावात कोरोनामुळे मृत झालेल्या एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जवळपास १५० लोकांनी गर्दी केली. त्याची ही गर्दी अनेक लोकांच्या जीवावर बेतली आहे. कारण आता २१ दिवसात जवळपास २१ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तहसीलच्या खीरवा गावात गेल्या २१ दिवसांत २१ हून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे लोक घाबरले आहेत. यानंतर राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके खेराव गावात पोहोचली आहेत. तथापि, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एप्रिल ते मे दरम्यान गावात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केवळ चार मृत्यू झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खीरवा गावात कोरोना संक्रमणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्ययात्रेसाठी जवळपास १५० लोक जमा झाले. यादरम्यान कोरोना प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात आलं नाही. या माणसाला ज्या प्लास्टीकच्या पिशवीत आणलं होतं. त्यावेळी अनेकांनी स्पर्शदेखील केला. लक्ष्मणगडचे अधिकारी कलराज मीणा यांनी सांगितले की, ”२१ पैकी फक्त ४ लोकांचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाला आहे.
मृतांमध्ये जास्त वयाच्या लोकांचा समावेश आहे. तरीसुद्धा आम्ही ज्या कुटुंबातील लोक वारले आहेत. त्यांच्या १४७ नमुने घेतले आहेत. जेणेकरून कोरोना व्हायरसचं सामुदायिक संक्रमण झालं आहे की नाही याबबत माहिती मिळवता येऊ शकेल. ” प्रशासनाकडून गावाला कोरोनामुक्त बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या आजारपणाबाबत माहिती घेऊन त्यांना सहकार्य केले आहे.