सोलापूर, दि. 8 – उजनी धरणातील पाण्याचा एक थेंब पण दुसरीकडे जाऊ देणार नाही असे सांगत प्राण जाय पर पाणी न जाय हीच आमची भूमिका आहे, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता दिला. शनिवारी कॉंग्रेस भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला घेऊन जाण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री भरणे यांनी स्वतः पाणी नेणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांच्या भूमिकेवरून सोलापूरकर आक्रमक झाले आहेत. भरणे यांनी वाढता विरोध लक्षात घेऊन उजनीचे पिण्याचे नव्हे तर पुण्यातून उजनीत मिसळणारे सांडपाणी आपण शेतीला घेऊन जात असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान येणाऱ्या उन्हाळ्यात 3-4 महिन्याचे पाण्याचे नियोजन केले पाहिजे. उजनी प्लसमध्ये असूनसुद्धा सोलापूरला 15 दिवसाला पाणी मिळते, ही महानगरपालिका सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनमध्ये ताळमेळ नसल्यामुळे सोलापूरच्या लोकांना आज भटकंती करावी लागत आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही आणि म्हणून येणाऱ्या उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी सोलापूर शहराला मिळालेच पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेणार आहोत, दर दहा दिवसाला अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ते पाण्याचे नियोजन कसं करतात ते लेखी घेणार आहोत.
येणाऱ्या तीन चार महिन्यांत प्रत्येक सोलापूरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही याची काळजी घेणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.