इस्लामपूर (प्रतिनिधी) – आज शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास इस्लामपूरकरांनी शून्य सावलीचा आनंद घेतला. लॉकडाऊन मध्ये मुलं घरी असताना पालकांनी त्यांना अंगणात, टेरेसवर जावून शून्य सावलीचा आविष्कार अनुभवायाला दिला. स्वतःची सावली पायात कशी गायब होते याचे मुलांना औत्सुक्य होते. विस्मयकारक वाटावा असा हा खगोलीय चमत्कार अवघा पाच सहा मिनिटेच घडताना पाहायला मिळाला.
सूर्य आकाशात तळपत असताना इस्लामपूर ( जिल्हा-सांगली) येथे साडेबारा वाजता सूर्यकिरणे लंबरूप पडली होती. त्यामुळे परिसरातील सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात गायब झाल्या. त्या दिसेनाशा झाल्या.जमिनीला लंबरुप असलेल्या मोठ मोठ्या वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात पडल्याने त्या नाहीशा झाल्या होत्या. हा खगोलीय चमत्कार घडताना अनेकांनी तो अनुभवला.
आज शुक्रवारी कोणत्याही वस्तूची सावली नेहमी प्रमाणे कोणत्याही दिशेला शोधूनही सापडली नाही. कारण ती तेंव्हा त्या वस्तूच्या पायात पडलेली होती. काही काळ गायब झालेली दिसली. फक्त पाच ते सहा मिनिटांच्या काळात परिसरातील सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात गायब झाल्या होत्या. सावली दिसेनाशा झाल्या. उंच इमारती, पुतळे, मंदिरांची गोपूरे, दीपमाळा, टाॅवर, लाईटचे पोल इत्यादी जमिनीला लंबरुप असलेल्या मोठमोठ्या वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात पडल्याने त्या नाहीशा झालेल्या अनेकांनी अनुभवल्या.
याबाबत बोलताना सई मोहिते म्हणाली ,” सुट्टीत वाचन करताना शुन्य सावली म्हणजे काय हे वाचनात आले होते. आज शुक्रवारी साडेबारा वाजता शून्य सावली आविष्कार पाहताना मी माझ्या भावंडांना तो अनुभव दिला. हे क्षण मोबाईल मध्ये फोटोच्या स्वरूपात टिपले. आम्ही पाच-सहा मिनिटे धम्माल केली.”
“शून्य सावली आविष्कार ” म्हणजे काय ?
आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे. तिचा भ्रमण अक्ष तिच्या भ्रमण कक्षेच्या प्रतलाशी २३.५ अंशांनी कललेला असल्याने आपण सूर्याचे उत्तरायण -दक्षिणायण अनुभवतो. त्यानुसार सहा महिने सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धात(२३.५ अंश) कर्कवृत्तापर्यंत होतो तर सहा महिने दक्षिण गोलार्धात मकर वृत्तापर्यंत (२३.५ अंश) होताना दिसतो. या विषुववृत्ताच्या दक्षिणोत्तर पट्यास ‘उष्ण कटिबंध ‘ म्हणतात. उष्ण कटिबंधातील प्रत्येक भूभाग वर्षातून किमान दोनवेळा सूर्याच्या समोर येतो, तेंव्हा तेथे सूर्यकिरण लंबरूप (काटकोनात) पडतात. परिणामी त्या परिसरात माध्यान्ह वेळी (mid day time) ला सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात पडतात. त्यामुळे काही काळ तेथील वस्तू (shadow less /zero shadow) सावली हरवून बसतात. या मजेशीर खगोलीय घटनेस “शून्य सावली आविष्कार ” म्हणतात. उष्णकटीबंधाच्या बाहेरील कोणत्याही भागात असे घडंत नाही.
३१ मे पर्यंत राज्यात विविध ठिकाणी दिसेल शून्य सावली..
आपल्या शहरांच्या अक्षांशा प्रमाणे शुन्य सावली दिवस बदलतो. ३१ मे पर्यंत राज्यातील विविध भागात”शुन्य सावली आविष्कार “पाहता येणार आहे. त्याचे वेळापत्रक गूगलवर सहज उपलब्ध आहे. ही गायब झालेली सावली आपण छोट्याशा प्रयोगाच्या सहाय्याने मनोरंजक पद्धतीने पाहू शकतो. टेबल/टेरेसवर चार ठोकळयांवर काच ठेवून त्यावर विविध प्रकारच्या उंच वस्तू मांडून त्यांच्या सावल्यांचे निरीक्षण करु शकतो. शहराच्या शून्य सावली दिवशी सूर्य माथ्यावर येईल तेंव्हा टेरेसच्या ,अंगणाच्या मैदानावर मध्यभागी उन्हामध्ये उभे राहून मुलांनी शून्य सावली अनुभववयाला द्या..