पुणे,दि.28 -कात्रज नव्या बोगद्यात दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दुचाकी चालक आणी पादचारी जागेवरच मयत झाले. तर दुचाकीच्या मागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक किशोर कदम (25,रा.मंदार अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मयताचे नाव आहे. तो सिव्हील इंजिनिअरींगचा डिप्लोमा करत होता. तर पादचारी मयताची ओळख पटू शकली नाही. अभिषेक सोबत त्याचा मित्र होता, तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सायंकाळी साडेसाच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक व त्याचा मित्र दुचाकीवरुन जेवायला गेले होते.
ते बोगदा ओलांडून पलिकडे गेल्यावर पुन्हा बोगद्याकडे वळले. यावेळी त्यांचा दुचाकीवरील ताबा गेल्याने ते बोगद्यातून चालत चाललेल्या व्यक्तीला जोरात धडकले.
यामध्ये त्यांची दुचाकी स्लीप होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत अभिषेक व पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला होता.