पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याऐवजी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी शिक्षक, पालक यांच्याकडून होऊ लागली आहे.
सीबीएसई, सीआयएससीई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र बोर्डाची दहावीची जूनमध्ये होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते. यंदा ही परीक्षा 25 एप्रिलला होणार होती. करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा 23 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, तरीही मे महिन्यात परीक्षा घेणे सहजासहजी शक्य होणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 6 लाख 28 हजार 630 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. यात पाचवीसाठी 2 लाख 42 हजार 302 तर आठवीसाठी 3 लाख 86 हजार 328 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.
राज्यातील 47 हजार 612 शाळांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.दरम्यान, शासनाकडून ही शिष्यवृत्तीची परीक्षाही रद्द होण्याची शक्यता आहे. वर्षभर शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा मनापासून अभ्यास केला आहे.
सरावासाठी बऱ्याचशा प्रश्नपत्रिका ही सोडविल्या आहेत. गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, मेहनती शिक्षकांना कृतकृत्य होण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. सध्याच्या काळात परीक्षा घेणे अवघड वाटत असले तरी परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार नाही. परीक्षा लांबणीवर पडली तरी चालेल पण परीक्षा घ्यावीच, असा आग्रह शिक्षक, पालक यांच्याकडून केला जात आहे. याबाबतची पत्रे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पाठविण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे.