– अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचे नेतृत्त्व करत आहे. खरेतर त्याच्या नेतृत्वावर आजवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पण यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही कोहलीने क्रिकेटच्या पारंपरिक संकेतांनाच फाटा दिला. संघाची रणनिती सामन्याची नाणेफेक झाल्यावर लगेचच उघड करावी का, असा प्रश्न आता उत्पन्न झाला आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेक झाली. तेव्हा डेव्डिड वॉर्नर व कोहलीने टीम एक्सचेंज केली. इथवर बरोबर होते. मात्र, त्याला समालोचकांनी संघबदलाबाबत विचारणा केल्यावर कोहलीने त्याला उत्तरही दिले. मात्र, त्यावेळी खूप मोठी चूक केली. एक अशी चूक की जी आजवर कोणत्याही कर्णधाराने केलेली नाही. संघाची प्रत्येक सामन्यासाठी जेव्हा बैठक होते तेव्हा त्यात रणनिती निश्चित केली जाते. ती थेट जाहीर करणे चूक असते. त्याला काही नियम नाही, पण संकेत पाळले जातात. कोहलीने आपल्या रणनितीचे जाहीर वाचन करत या संकेतांनाच हरताळ फासला.
शाहबाज अहमद हा संघात निवडला गेला असून त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाणार आहे, असे कोहलीने थेट सांगितले. यावेळी खुद्द समालोचकांनीही आश्चर्य व्यक्त केले. आता खरी टीका सुरू होणार आहे. अनावधानाने बोलून गेला असे म्हणावे तर कोहली काही राजकारणी नाही. किंवा माध्यमांनी या बातम्या दिल्या त्यावर माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला, असे राजकारण्यांप्रमाणे बोलण्याची सोय देखील नाही.
संघाचे डावपेच, रणनिती याबाबत बोलण्याचे जवळपास सर्व कर्णधारांकडून टाळले जाते. ऑस्ट्रेलियाचे कर्णधार तर यात एकदम माहिर आहेत. त्यांना मीडिया मॅनेजमेंटचे धडे संघात निवड झाल्यावर लगेचच दिले जातात. मला वाटते की, आता भारतीय संघाच्या या कर्णधारासह सगळ्या खेळाडूंनाही असे धडे दिले गेले पाहिजेत.
कोहलीच्या या वक्तव्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तींना अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण कोहलीचा स्वभावच तसा आहे. राग असो आनंद असो त्याला महेंद्रसिंह धोनीसारखा लपवता येत नाही. धोनी जसा कॅप्टन कुल होता तसे कर्णधार विरळाच. पण संकेत पाळायला काय हरकत आहे.
कोहलीने यंदाच्याच आयपीएल स्पर्धेतील हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यावर आपला राग डगआऊटकडे येत असताना वाटेत असलेल्या खुर्चीवर काढला. आपली बॅट त्याने खुर्चीवर आपटली होती. त्याच्या या वर्तनावरून सामनाधिकाऱ्यांनी त्याला फटकारलेही आहे. पण त्याचा स्वभावच आक्रमक आहे, त्याला औषध नाही हेच खरे. मात्र, आता तो कर्णधार आहे. तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे किंवा बेंगळुरू संघाचे याला महत्त्व नाही. पण नेतृत्व करताना तो जागतिक क्रिकेटचे संकेत पाळतो का नाही हे जास्त महत्त्वाचे आहे.
या प्रकाराला फिक्सिंग म्हणावे तर आपली जीभ रेटत नाही. पण प्रतिस्पर्धी संघाला आपल्या रणनितीची माहिती देणे हे देखील एक प्रकारचे गैरवर्तनच आहे, यात शंका नाही. कोहलीला हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्याच्यावर होत असलेली टीका थांबेल. कोहलीसमोर खूप मोठी कारकीर्द आहे. येत्या काळात आपल्या आक्रमक स्वभाव, वर्तन आणि रागावर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे याचा त्याला निश्चितच भविष्यात विचार करावा लागेल.