पुणे: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून सुमित्रा भावे या आजारी होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा भावे यांनी आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.
सुमित्रा भावे यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी 1984 मध्ये लघुपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली. त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीत 14 चित्रपट हे सुनील सुकथनकर यांच्यासोबत केले होते. दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि सर्वसामान्य माणसांच्या गोष्टी त्यांनी चित्रपटातून मांडल्या. राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कारांवरही त्यांनी नाव कोरले.
सुमित्रा भावे यांचे बाई आणि पाणी हे लघुपट लोकप्रिय झाले होते. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी दोघी हा चित्रपट तयार केला. पुढे दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु या चित्रपटांचेही प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केलं. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांच्या चित्रपटांनी ठसा उमटवला. विचित्र निर्मिती या बॅनरखाली त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली.
पुण्यात 12 जानेवारी 1943 मध्ये सुमित्रा भावे यांचा जन्म झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेत ग्रामीण विकास या विषयात पदविका घेतली. सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये काम केले. समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत असतानाच त्यांनी लघुपट निर्मिती करण्यास सुरवात केली होती.