न्हावरे – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथील दैवताला श्रध्देतून सोडलेल्या वळू बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतक-याचा अखेर आज(दि.१८) मृत्यू झाला. या घटनेने आलेगाव पागा परिसरातून भीती व्यक्त होत आहे.
या घटनेत शिवाजी रामभाऊ आरवडे (वय-८२) या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी आरवडे हे आपल्या घरानजीक गावांतील मुख्य चौकात उभे असतांना पाठीमागून धावत येऊन बैलाने आरवडे यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, या बैलाने आरवडे यांना शिंगाने जोरदार वर उचलून खाली पाडल्याने आरवडे यांच्या बरगाड्यांना व मांडीला गंभीर जखम झाली होती.
त्यामुळे पुढील उपचारासाठी ससून पुणे येथे हलविले होते.मात्र, अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आलेगाव पागा येथील ग्रामदैवताला श्रद्धेतून गावात सोडलेल्या वळू बैलाने यापूर्वीही गावातील अनेक ग्रामस्थ तसेच जनावरांच्यावर वारंवार हल्ले करून गावात मोठ्या प्रमाणावर दहशत माजवली आहे.
या बैलाचा बंदोबस्त करावा यासाठी ग्रामपंचायतीने यापूर्वी संबंधित ज्या व्यक्तीने देवाला वळू बैल सोडला आहे. त्या मालकाला लेखीसमज दिली.तसेच काही ग्रामस्थांनी वारंवार मालकाला बैलाच्या वाढत्या हल्याबाबत सांगितले होते.परंतू, त्यांनी कुणालाही कुठलीच दाद न दिल्याने गावातील आरवडे शेतक-याचा बळी गेला आहे.
आरवडे शेतकरी हे दररोज शेतीकाम करून आपली गुरे राखत होते.त्यांच्या या दुर्देवी मृत्यूने व त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आलेगावपागा परिसरातून दु:ख व्यक्त होत आहे.तरी संबधीत दोषी व्यक्तीवर मनुष्यवधाचा चा गुन्हा दाखल करून ताबडतोब कारवाई करावी.अशी मागणी ही अंत्यसंस्कार समयी उपस्थित असलेल्या शोकाकुल नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे.