नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. तर पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्याचवेळी येथे करोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द केल्या. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीचा आणि करोनाचा एकमेकांशी संबंध जोडणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
देशात एकीकडे लॉकडाऊन सारखी परिस्थिती असताना दुसरीकडे निवडणुकांच्या प्रचार सभा जोरात सुरू आहे. यावर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र अमित शहा यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला निवडणुकांशी जोडणं योग्य नसल्याचं म्हटलं. ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्येही करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचं त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात निवडणुका आहेत का ? त्या ठिकाणी ६० हजार रुग्णांची नोंद होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रासाठीही मला सहानुभूती आहे आणि पश्चिम बंगालसाठीही. या गोष्टीला निवडणुकांसोबत जोडणं योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत, त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. आता तुम्ही काय सांगाल?,” असं अमित शहा म्हणाले. ते एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
लॉकडाऊन संदर्भात शहा म्हणाले की, सध्या लॉकडाऊन लागू करणे म्हणजे घाई करण्यासारखे आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचा हेतू वेगळा होता. त्यावेळी देशाकडे औषध किंवा लस नव्हती. मात्र आताची स्थिती वेगळी आहे. आम्ही राज्यांसोबत सतत संपर्कात आहोत, सध्यातरी संपूर्ण देश लॉकडाऊनबाबत कोणताही विचार नाही, असे अमित शहा म्हणाले.