पाचगणी (प्रतिनिधी) – जावळीत आज मुसळधार पाऊस पडला. आखेगणी (ता.जावळी) येथे एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम गावडे (वय33) असे आहे.
यासंदर्भात जावळी येथील तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर तुकाराम गावडे हे आपल्या शेतात काम करत असतानाच अचानकच पाचच्या सुमारास आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी ज्ञानेश्वर गावडे यांच्या अंगावर वीज पडली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळं आखेगणी गावावर शोककळा पसरली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जावळी तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस पडत आहे. सध्या शेतात सुगीचे दिवस सुरू आहेत. शेतकरी गहू, ज्वारी पिकांची काढणी भरणी करत आहेत. यातच अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे.