नवी दिल्ली : वाढत्या करोना रुग्णसंख्येला लगाम घालण्यासाठी सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी रात्रीपासून लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाऱ्या लॉकडाउनची करोना रोखण्यास फारशी मदत होणार नसल्याचा सल्ला केंद्राने महाराष्ट्राला दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या सचिवांना याबद्दल सूचना केल्या होत्या, याविषयीची माहिती आता समोर येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयीची माहिती दिली. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबद्दल सूचना केल्या होत्या. “केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांना बोलण्यासाठी भरपूर वेळ देण्यात आला होता. त्यावेळी आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लावण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती,” अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
१५ मार्च रोजी राज्यात १६ हजार ६२० नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्रही पाठवले होते. ज्यात लॉकडाउन न लावता कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. “नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन यासारखे उपाय संक्रमण रोखण्यात फार प्रभावी नाहीत. त्याऐवजी जिल्हा पातळीवरील प्रशासनाने कंटेनमेंट उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा,” असे भूषण यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेले होते.
राज्यात कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णयावर बद्दलही माहिती दिली. “आरोग्य विभागाच्या अभ्यासानंतर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाही करोना नियमावलीचं पालन करण्यात लोक उदासीन दिसत आहेत. लोकांकडून सहकार्य केलं जात नाही,” असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
“वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या ताणाबद्दल अंदाज लावण्यात आला. दोन मुद्द्यांवर राज्यातील भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. यात बेड्सची संख्या आणि पुरेसा ऑक्सिजन. त्यात तज्ज्ञांनी असे सांगितलं की, ही रुग्णवाढ याच वेगाने होत राहिली, तर १७ एप्रिलपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल,” अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.