मुंबई – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचे पाप फेडावं लागेल. अनिल देशमुख यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता पुढील ४० दिवसांत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला. तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे. ४० दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असे वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.
दरम्यान, देशमुखांच्या आडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पदाला शोभणारी नाही. पहिले सचिन वाझेंची पाठराखण केली. यानंतर त्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. एवढे सगळे होऊनही मुख्यमंत्र्यांनी एकही प्रतिक्रिया दिली नाही हे आश्चर्यजनक आहे. मुख्यमंत्री पदाचा मान राखून आणि घराण्याचा मान राखून त्यांनी तत्काळ कारवाई करायला हवी, असे फडणवीस यांनी म्हटले होते.