मुंबई – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये दीपाली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. आता या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालविण्याचा आणि तो खटला चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
RFO दीपाली चव्हाण प्रकरणाची वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी. तसेच जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी फडणवीसांनी ट्विट करून केली आहे.
अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते.#DeepaliChavan
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
फडणवीस म्हणाले की, ‘खरं तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट घालण्यात येतोय. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपी व्यक्तीचा बचाव करण्याचाच महाविकास आघाडीचा अट्टहास का, असा प्रश्न फडणवीस यांनी केला.