राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये शिरलो आणि इकडेतिकडे जागा शोधण्यासाठी नजर फिरवू लागलो. सहज ड्रायव्हरकडे नजर गेली तर काहीसा धक्काच बसला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला चक्क शीख ड्रायव्हर होता. डोक्याला फेटा, हातात कडं, वाढलेली दाढी हा सारा शीख वा सरदारजी आहे याची खात्री पटविणारा ऐवज त्याच्याजवळ होता. आजवर जेव्हा जेव्हा बसने प्रवास केला, तेव्हा तेव्हा कधीच शीख ड्रायव्हर बस चालवितो आहे असे चित्र दिसले नाही. मुळात पंजाब प्रांतातील बस आणि संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या ट्रकवरचे सरदारजी ड्रायव्हर सोडले तर बाकी कुठेही कोणत्याही सार्वजनिक वाहनांवर फेटाबिटा घातलेला शीख माणूस ड्रायव्हिंग करताना दिसत नाही. त्यामुळेच मला या आताच्या बसमध्ये शीख ड्रायव्हर स्थानापन्न झालेला बघून मोठे आश्चर्य वाटले होते. माझा प्रवास मोठा होता. साताठ तास लागणार होते. म्हटलं, बस चहापाण्यासाठी थांबली की या ड्रायव्हरला भेटूच भेटू!
प्रारंभीचे सोपस्कार उरकून बस मार्गस्थ झाली. मला एक खिडकीकडची उत्तम जागा मिळाली. गाव मागे पडलं तसं मी पिशवीतून वर्तमानपत्र काढलं आणि वाचू लागलो. काही मिनिटांत प्रवासाची जाणीव नाहीशी झाली आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांनी मनाचा ताबा घेतला. बस आता पूर्ण भरात पळत होती. किती वेळ गेला कोण जाणे, वर्तमानपत्राचे पान बदलण्यासाठी म्हणून शरीराची हालचाल केली, डोके आणि नजर सहज वर गेली तर समोर सरदारजी ड्रायव्हरचा फेटा दिसला.
पुन्हा एकवार त्याच्याविषयी उत्सुकता दाटून आली. हा माणूस पंजाबमधून इकडे कसा आला असेल, आपल्या परिवहन महामंडळात कसा लागला असेल, याला इकडचा भूप्रदेश, इकडचे माणसं याविषयी काय वाटत असेल असे अनेक प्रश्न मनाभोवती जमले. त्यांचा ऊहापोह गाडी थांबल्यावर करायचाच असं पुन्हा एकवार मनाशी ठरवलं आणि पुन्हा एकवार वर्तमानपत्रात डोकं खुपसलं.
अजून काही वेळ गेला आणि गाडी थांबल्याचे लक्षात आले. कंडक्टर मोठ्याने सांगत होता, “गाडी दहा मिनिटे चहाला थांबेल, कोणाला बाहेर जायचे असेल त्याने जाऊन यावे.’ कंडक्टरचे शब्द कानी पडले आणि मी ताडकन् उठलो, मला चहापाण्यापेक्षा ड्रायव्हरला भेटण्यात अधिक रस होता. माझ्यापुढे उतरणाऱ्याची रांग होती. त्यामुळे उतरायला काही मिनिटे गेली तेवढ्यात तो दिसला. डोक्यावरचा फेटा हीच त्याची चटकन् लक्षात येणारी खूण आणि ओळख. मी लगबगीने त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो.
“नमस्ते सरदारजी’
“नमस्ते’
“कहॉं के हो?’
“मुंबईका’
“अरे, मुझे लगा, पंजाबसे हो’
“नही’
“फिर एस.टी. मे कैसे लगे’
“लग गया वैसाही’
त्याचा बोलण्याचा एकूण ढंग बघता त्याला माझ्याशी फारसे बोलायचे नव्हते हे लक्षात आलं. मी संभाषण अजून पुढे नेणार तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवण्यास सुरुवात केली मग बसमध्ये जाऊन बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मी माझ्या जागेवर आलो. म्हटलं, पुढे कुठेतरी त्याला भेटू. बस सुरू झाली. गार हवेच्या झोतामध्ये केव्हा डोळा लागला ते कळलंही नाही. डोळे उघडले तेव्हा बस कुठेतरी थांबली होती. मी परत एकदा खाली उतरलो. ड्रायव्हरचे भूत डोक्यातून गेलेले नव्हते. मी त्याला शोधू लागलो तो आणि कंडक्टर एका कोपऱ्यात बसून चहा पित होते. त्यांच्या टेबलावर जाऊन बसलो. दोघांना नमस्कार केला आणि पुन्हा एकवार त्याच्याशी बोलू लागलो.
“ड्रायव्हरसाब, मुझे पंजाब और पंजाबके लोगोसे बहूत प्यार है’
तो फक्त हसला.
“हिंदी फिल्मोमे पंजाब बताते है, सब तरफ पिलेवाले फूल और हरीभरी खेती, सरसोका साग मकेकी रोटी, वो फूल ग्लास लस्सी ये सब देखके लगता हे, पंजाबने दस-पंधरा दिन जाके रहना चाहिए.’ या माझ्या एवढ्या मोठ्या वाक्यावरही तो फक्त हसला. मी पुढे बोलतच राहिलो. ये भटिंडा, जालंदर, अमृतसर ये सारे गांव के नाम भी कैसे जबरदस्त लगते है! पंजाबके लोग पॉवरफुल, उनका खाना पॉवरफुल, गांव और शहर के नाम पॉवरफुल सब एकदम अच्छा-अच्छा लगता है!
त्याने माझ्याकडे पाहिले. नमस्कार केला आणि तो बसकडे चालू लागला. आता प्रवासाचा शेवटचा टप्पा लागला होता. दोन तासांच्या प्रवासानंतर इप्सित ठिकाणी बस येऊन पोहोचली. मी त्याच्याशी खूप काही बोलूनही त्याने फारसे काही न बोलल्याने मी मनातून खट्टू झालो होतो. म्हटलं जाऊ दे, एखाद्या माणसाला मुळातच कमी बोलायला लागते. गाडी थांबल्यावर सावकाशपणे सामान काढले. मधल्या रांगेत बळजबरीने शिरण्याचा कुठलाही अट्टाहास केला नाही. काही मिनिटांत त्या रांगेचा एक हिस्सा मी झालो आणि हळूवारपणे दारातून खाली उतरलो. समोर बघतो तर तो शीख ड्रायव्हर उभा होता. मला पाहताच माझ्याजवळ आला आणि माझ्या हाताला धरून मोकळ्या जागेत घेऊन गेला. मी त्याच्याकडे अचंबित होऊन पाहात होतो, तेवढ्यात तो बोलू लागला, “हे बघा साहेब, तुमचा माझ्याविषयी गैरसमज झाला आहे.’
त्याचं ते शुद्ध मराठीत बोलणं थोडंसं आश्चर्यकारक होतं खरं पण एवढी वर्षे महाराष्ट्रात राहातोय म्हटल्यावर उत्तम मराठी कोणालाही येऊ शकते, हे लक्षात येत होतं.
“कसला गैरसमज?’ मी त्याला विचारल. तेव्हा तो बोलू लागला.
“मी महाराष्ट्रीय माणूस आहे. सीताराम पाटील माझं नावं!
“अरे, मग हा फेटा आणि ही दाढी वगैरे?’ माझा प्रश्न त्याच्या पुढ्यात टाकला.
“बरोबर आहे शंका. मी ज्या गल्लीत राहायचो त्या गल्लीत आमच्या शेजारी एक शीख कुटुंब राहात होतं. त्या कुटुंबातला मुलगा बलदेव माझ्याच वयाचा. त्यामुळे आमची खूप घट्ट मैत्री झाली. कौटुंबिक संबंध निर्माण झाले. आम्हाला दोघांना एकमेकांशिवाय करमेनासे झाले. थोडं मोठं झालो आणि बलदेवच्या वडिलांची बदली झाली. त्याला दुसऱ्या गावी जावं लागलं पण मैत्री काही तुटली नाही. काळाच्या ओघात दोघांना नोकऱ्या लागल्या. लग्न झाली. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही धावत एकमेकांना भेटायला जात असू. कधी तो येई, कधी मी जाई.
आमच्या दोघांच्या बायकाही उत्तम मैत्रिणी झाल्या. त्याला दोन मुलं आणि मला एक मुलगी एक मुलगा झाले. सारं आनंदात चाललेलं असताना बलदेव काही कारणाने पंजाबमध्ये गेला आणि तिकडे त्याच्या गाडीला अपघात होऊन तो जागच्या जागी मृत्यूला शरण गेला. त्याच्या घरच्यांची परिस्थिती शब्दांच्या पलीकडची होती. पण माझ्यावर जो आघात झाला, त्यातून सावरणं मला कित्येक महिने कठिण गेले. हळूहळू मी सावरलो. पण बलदेवला विसरू शकलो नाही. माझ्या आणि त्याच्या मैत्रीची आठवण सदैव ताजी राहावी म्हणून असं काहीतरी करायला हवं जे… माझ्या डोळ्यासमोर राहील असं मला वाटू लागलं. आणि एक दिवस अचानक ही कल्पना सुचली.’
“कोणती?’ मी भारावलेल्या स्वरात विचारलं.
“आपण बलदेवसारखा पेहराव करायचा. सरदारजी करता तसा वेश. तो चढवला म्हणजे आपल्यातच बलदेव आहे असं आपल्याला वाटेल, त्याची आठवण कायमच आपल्यासोबत असेल आणि मी त्याला खरखुरी आदरांजली ठरेल. तेव्हापासून मी सरदारजीच्या वेशात आहे.’ त्याचं ते विश्लेषण मी ऐकलं आणि त्याला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून येऊ घातलेल्या अश्रूंना त्याने आवर घालण्याचा प्रयत्न केला, पण काही चुकार थेंब डोळ्याच्या बाहेर आलेच ते तो वळला आणि स्टॅंडमध्ये चालत चालत शिरला त्यावेळी मी त्याच्या पाठमोऱ्या डोंगरासारख्या व्यक्तिमत्त्वाकडे बघत राहण्याशिवाय अजून काय करू शकत होतो?
डॉ. विनोद गोरवाडकर