मुंबई – गृहखातं कोण चालवतं? गृहमंत्री अनिल देशमुख की, शिवसेना नेते अनिल परब? असा परखड सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तसेच शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला असल्याचा थेट आरोप केला आहे.
परमबीर सिंह यांनी पाठविलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अँटिलियाच्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विविध खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेले खुलासे धक्कादायक आहेत. पण असा खुलासा करणारे परमबीर सिंह हे पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी महाराष्ट्राचे डीजी सुबोध जयस्वाल यांनीही एक रिपोर्ट राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. पोलिसांच्या ट्रान्सफरमधील रॅकेट, पैशांची देवाण-घेवाण, त्यातली दलाली यासंदर्भातील संपूर्ण माहिती असणारा एक अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सादर केला होता.
हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता. पण तरिही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद सोडून केंद्रीय सेवेमध्ये गेले. त्याचं कारण होते की, सर्व काही जयस्वाल यांनी उघडकीस आणून ही साधी चौकशी लावली गेली नाही.
“मुळात हे प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इन्टेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट सुरु आहे. काही दलाल पैसे खात असल्याचे समजले. त्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांच्या कार्यालयाचे नाव समोर येत आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिश्नर इन्टेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्यासंदर्भातील रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून तेव्हाचे डीसीएस होमची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्विलन्सवर लावले. त्या फोनमधून जे काही बाहेर पडले ते अत्यंत धक्कादायक होते. म्हणून तो रिपोर्ट सादर झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यावर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिश्नर इन्टेलिजन्सवरच कारवाई झाली. त्यांना पदावरुन दूर करण्यात आले. त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती, त्यातल्या अनेक लोकांना त्या-त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी शरद पवारांची पत्रकार परिषदही पाहिली, त्यात शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला. मात्र सुबोध जायस्वाल यांची बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी यासंदर्भातील योग्य कारवाई झाली असली, तर आज ही वेळ आली नसती.
तसेच सचिन वाझे यांना परमबीर सिंह यांनी सेवेत घेतले. हे खरं आहे. पण शरद पवारांनी अर्धसत्य सांगितले. पवार म्हणतात प्रकरणाची चौकशी माजी डीजी रिबेरो यांनी करावी. त्यांच्या बद्दल आदर आहे, मात्र कोणाची चौकशी करावी, परमबीर सिंह यांची की, संपूर्ण प्रकरणाची? आणि एक माजी डीजी आताच्या प्रकरणाची चौकशी करू शकतो का?” असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केले.