मुंबई – ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात दहशतवाद प्रतिबंधक पथकाने रविवारी पहाटे दोन जणांना अटक केली, अशी माहिती या पथकाचे अतिरिक्त महासंचालक जलजितसिंग यांनी दिली.
लाखन भैय्या चकमकप्रकरणातील जामीनावर बाहेर आलेला दोषी हवालदार विनायक शिंदे(वय 55) यांसह बुकी नरेश धरे (वय 31) यांना अटक करण्यात आली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ लावल्यानंतर दहा दिवसांनी त्या स्कॉर्पिओचा मुळ मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रेतीबंदर खाडीत सापडला होता. त्यावेळी मृतदेहाच्या तोंडात बोळा कोंबलेला होता. त्यांचे तोंड लाल रंगाच्या स्कार्फने झाकलेले होते. त्यांच्या सर्व चीजवस्तू गहाळ झालेल्या होत्या.
तीन दिवसांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला आपल्या पतीचा खून झाला असावा. त्यात त्यांनी हा खून सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी केला असावा असा संशय व्यक्त करणारा जबाब दिला होता.