नवी दिल्ली -आप सरकारने संपूर्ण दिल्लीत तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला भाजप आणि कॉंग्रेसकडून विरोध का होत आहे ते समजत नाही. भारतात नाही; तर पाकिस्तानात तिरंगा फडकवायचा का, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.
दिल्ली विधानसभेत बोलताना केजरीवाल यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप आणि कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. देश सर्वांचाच आहे. देशभक्तीवरून राजकारण केले जाऊ नये. राष्ट्रध्वजाचे दर्शन आपल्याला सीमांवर सज्ज राहून लढणाऱ्या जवानांविषयीची जाणीव करून देते. त्यामुळे आप सरकारने अर्थसंकल्प मांडताना दिल्लीत 500 ठिकाणी तिरंगा फडकावण्याची घोषणा केली. त्या निर्णयाला भाजप आणि कॉंग्रेसने पाठिंबा द्यायला हवा, असे ते म्हणाले.
दिल्लीला 2048 या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आप सरकारने व्यक्त केला. त्याची खिल्ली आमचे विरोधक उडवत आहेत. मात्र, आपण ते एकत्रितपणे साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील काही काळात केंद्र आणि बहुतांश राज्यांनी तुटीचे अर्थसंकल्प सादर केले. मात्र, कठीण काळातही शिलकीचा अर्थसंकल्प मांडणो दिल्ली हे एकमेव राज्य ठरले, अशी टिप्पणीही केजरीवाल यांनी केली.