नवी दिल्ली – देशभरातील राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारीमध्ये पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. या क्रमवारीमध्ये बंगळूरू शहराला अव्वल क्रमांक मिळाला आहे. पुण्यापाठोपाठ अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोयंबटूर, वडोदरा, इंदूर आणि नवी मुंबई या शहरांचा क्रमांक लागला आहे.
राहणीमान सुलभता निर्देशांक आणि स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकाच्या अंतिम मानांकनांची घोषणा आज गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ऑनलाइन कार्यक्रमात केली. दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 अंतर्गत मानांकनाची घोषणा करण्यात आली. यासाठी 2020 मध्ये मूल्यांकन सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्यात 111 शहरांनी भाग घेतला. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली होती. दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असणारी शहरे आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असणारी शहरे. यात स्मार्ट सिटीज कार्यक्रमाअंतर्गत सर्व शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या गटात बंगळुरू प्रथम क्रमांकावर, त्यानंतर पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोईंम्बतूर, वडोदरा, इंदूर आणि बृहन्मुंबई यांचा क्रमांक लागतो. दहा लाखाहून कमी लोकसंख्येच्या गटात, राहणीमान सुलभता निर्देशांकात सिमला शहर सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि तिरुचिराप्पल्ली यांचा क्रमांक आहे .
राहणीमान सुलभता निर्देशांकाप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकाअंतर्गत मुल्यांकन करण्यात आले. लोकसंख्येनुसार दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका आणि दहा लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांची वर्गवारी करण्यात आली. दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या गटात इंदूर, सर्वोत्तम महापालिका ठरली, त्यानंतर सूरत आणि भोपाळ यांचा क्रमांक आहे. दहा लाखाहून कमी लोकसंख्येच्या गटात नवी दिल्ली नगरपरिषद आघाडीवर आली असून त्यानंतर तिरुपती व गांधीनगर यांचा क्रमांक लागतो.
राहणीमान सुलभता निर्देशांकाची चौकट अधिक मजबूत करण्यासाठी त्याच्या व्याप्तीचा विस्तार करीत, देशात प्रथमच स्थानिक स्वराज्य कामगिरी निर्देशांक मूल्यांकन देखील केले गेले. या निर्देशांकात दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये इंदूरचा पहिला क्रमांक लागला. त्यापाठोपाठ सूरत, भोपाळ, पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदाबाद, रायपूर, नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि वडोदरा या शहरांचा क्रमांक लागला. तर गोवाहटीचा क्रमांक सर्वात शेवटचा लागला.
तर दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये नवी दिल्लीचा अव्वल क्रमांक लागला. त्यापाठोपाठ तिरुपती, गांधीनगर, कर्नाल, सालेम, तिरुप्पूर, बिलासपूर, उदयपूर, झांशी आणि तिरुनेलवेली या शहरांचा क्रमांक लागला. तर शिलॉंगचा क्रमांक सर्वात शेवटचा लागला.
पाच क्षेत्रातील कामगिरीचे विश्लेषण…
स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांक हा संबंधित पालिकांच्या कामगिरीच्या निश्चित मूल्यांच्या आधारे कामगिरीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न आहे. हा निर्देशांक ठरवताना महापालिकांच्या पाच क्षेत्रातील क्षेत्रीय कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामधे 20 विभाग आणि एकूण 100 निर्देशकांचा समावेश आहे. याअंतर्गत सेवा वित्त, धोरण, तंत्रज्ञान आणि प्रशासन या पाच मुद्द्यांवर मुल्यांकन केले गेले.
राहणीमान योग्य शहरांच्या निर्देशांसाठी राहणीमानाचा दर्जा आणि शहरी विकासासाठी विविध उपक्रमांच्या परिणामाचे मूल्यांकन केले जाते. नागरिकांची जीवनशैली, शहराची आर्थिक क्षमता, तिचा टिकाऊपणा आणि लवचिकता यावर आधारित देशभरातील शहरांची विस्तृत माहिती गोळा करून याबाबत नागरीकांचे मत काय आहे? दृष्टिकोण काय आहे? याचाही समावेश मूल्यांकनात केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकाच्या सर्वेक्षणातत नागरीकांच्या दृष्टिकोनाला, मताला 30 टक्के मुल्य ठेवण्यात आले असून यामुळे या प्रणालीची चौकट अधिकच भक्कम झाली आणि त्याची व्याप्ती वाढली आहे. जीवनशैली, आर्थिक क्षमता, शाश्वतता अशा 13 श्रेणींमध्ये याचे परिक्षण करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात नागरिकांना कशी सेवा मिळते याचे सर्वेक्षण करताना थेट नागरीकांकडूनच मते जाणून घेण्यात आली. त्यासाठी नागरीकांचा दृष्टिकोन सर्वेक्षण घेण्यात आले.
मूल्यांकनाला गेल्या वर्षी 16 जानेवारी पासून सुरुवात झाली आणि ते गेल्या वर्षी 20 मार्च पर्यंत करण्यात आले. 111 शहरांमधील एकूण 32 लाख 20 हजार नागरिक सर्वेक्षणात सहभागी झाले होते. भुवनेश्वरमधे सर्वाधिक नागरिकांचे दृष्टिकोन सर्वेक्षण झाले. त्यानंतर सिल्वासा, दावणगेरे, काकीनाडा, बिलासपूर आणि भागलपूर यांचा क्रमांक लागतो.