लोहगाव वार्तापत्र – प्रकाश बिराजदार
लोहगावात शहरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावाचा समावेश पालिकेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2017 मध्ये महापालिकेत समावेश झाल्यानंतर गावाचा विकास आता वेगाने होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तब्बल सव्वाचार वर्षानंतरही महापालिका प्रशासनाला पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याव्यतिरीक्त कोणतेही ठोस विकासकाम करता आलेले नाही. इतकेच काय तर, या भागाचा नगरसेवक कोण? असा प्रश्न येथील नागरिकांना पडतो.
लोहगावचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी लोहगाव-देहू हा जिल्हा परिषदेचा गट अस्तित्वात होता. यातील लोहगावची मतदारसंख्या देहूपेक्षा कितीतरी अधिक होती. तसेच, या दोन्ही गावातील अंतरही जास्त होते. मात्र, लोहगाव व आजूबाजूच्या गावातील मोठ्या मतदारसंख्येमुळे नेहमी लोहगावमधीलच उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून येत, त्यामुळे देहूकरांवर नेहमीच अन्याय होत होता, त्याचप्रमाणे पालिकेत समावेश झाल्यानंतर लोहगावची मतदारसंख्या कमी असल्याने देहूप्रमाणे लोहगावची अवस्था झाली होती.
दोन्ही प्रतिनिधी दुसऱ्या परिसरातील असल्यामुळेच या भागातील समस्या सुटत नाहीत. लोहगावचा सर्वांगिण विकास करण्यासाठी स्वतंत्र प्रभाग असणे आवश्यक आहे. मात्र, 2022 मध्ये येऊ घातलेल्या पालिकेच्या निवडणुकीत लोहगावचा स्वतंत्र प्रभाग होणार की वेगवेगळ्या प्रभागात समावेश करून इतिहासाची पुनरावृत्ती होणार, अशी भीती निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना वाटत आहे.
दरम्यान, लोहगावसह केशवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, धायरी, शिवणे, उत्तमनगर या अकरा गावांचा ऑक्टोबर 2017 मध्ये पालिकेत समावेश करण्यात आला. या अकरा गावांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत निवडून आलेले दोन्ही उमेदवार फुरसुंगी व धायरी भागातील आहेत, त्यामुळे त्यांचा लोहगावमध्ये संपर्कच नाही. लोहगावचे नगरसेवक कोण? हे सुद्धा बहुतांश नागरिक सांगू शकत नाहीत. तसेच, समस्या सोडवण्यासाठी व ऐकून घेण्यासाठी त्यांची संपर्क कार्यालये देखील नाहीत, त्यामुळे आपली व्यथा मांडायची कोणाकडे? असा प्रश्न लोहगावकरांना पडलेला आहे.