कोलकाता – सध्या सोशल मिडीया इतका पॉवर फुल झाला आहे की त्याच्यात सरकारही उलथून टाकण्याची ताकद निर्माण झाली आहे. असे झाले तर समाजात अराजक माजून लोकशाही कमकुवत होण्याचा धोका आहे म्हणून सोशल मिडीयावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन कायदे आणण्याचा विचार केला जात आहे अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी दिली.
आपल्या एका नवीन पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आज लोकशाहींवर मोठा ताण आला आहे. नवनवीन आव्हाने लोकशाहीपुढे निर्माण होत आहेत. राजकारणाशी संबंधीत नसलेले लोक संघटतीपणे डोके वर काढीत आहेत.
सोशल मिडीयाला कोणतीही सीमा नसल्याने त्याच्यावर नियंत्रण आणणे अवघड बनले आहे. त्यामुळे भारतीय घटनेच्या चौकटीत या मिडीयावर नियंत्रण आणणारे कायदे केले जात आहेत असे त्यांनी नमूद केले.
सध्याचे कायदे त्यासाठ पुरेसे नाहींत असे ते म्हणाले. त्यावर सरकार सतत कार्यरत आहे असे ते म्हणाले. ट्विटरला भारतीय कायद्याच्या चौकटीत वागण्याची नोटीस बजाऊनही त्याला त्यांनी दाद दिली नाही या पार्श्वभूमीवर सरकारने हा विचार सुरू केला आहे असे ते म्हणाले.