वाल्हे – यंदा हंगामात थंडीचा चढ-उतार सुरू होता अनेक दिवस ढगाळ वातावरणही निर्माण झाले होते, थंडीचा जोर सध्या ओसरला आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी (दि. 18) पुरंदर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून थंड वारे सुटले होते. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तुरळक सरीही कोसळल्या, त्यामुळे सकाळपासूनच वाल्हे परिसत रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला.
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीचा पेरा वाढला आहे. मुबलक पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी हमखास गव्हाची लागवड केली आहे. कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी कुटुंबासाठी आवश्यक तेवढ्या गहू पेरणीला प्राधान्य दिले आहे; परंतु सध्याच्या हंगामात ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता.
परिणामी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून औषधे फवारणी करीत पिकाची निगा राखली. दरम्यान, गेल्या 20 ते 25 दिवसापूर्वी थंडीचा कडाका पुन्हा वाढला होता. त्याचा फायदा गहू पिकाला झाल्याने गहू पिक जोमात आले आहे. मात्र, हवामान खात्याने दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून शेतकरी गहू पिकाच्या काढणीस जोमाने लागला आहे.
पारंपरिक पद्धतीचा वापर
मजुरांची कमतरता असल्याने बड्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टरची मदत घेतली असून, छोट्या शेतकरी मजुरांद्वारे किंवा स्वतः शेतात राबून गहू काढणी करीत आहे. हार्वेस्टरच्या साह्याने गहू मळणी केल्यास जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोगात येणारे भूसा मिळत नाही, त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाऊस लांबल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पण अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीचा वापर करताना दिसत आहे. वाल्हे (ता. पुरंदर) : अवकाळीच्या भीतीने हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढणीला वेग आला आहे.