नवी दिल्ली :अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव येथे मध्यरात्रीनंतर घडला. या अपघाताने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हळहळले असून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील १५ मजूर जागीच मृ्त्यूमुखी पडले. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. तत्पूर्वी या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.