सातारा -करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. यापुर्वीचा १६ जानेवारीचा आदेश रद्द करुन आता सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १0५ सहकारी संस्थांच्या निवडणुका तसेच सातारा जिल्हा बँक यांची निवडणुक १५ फेब्रुवारीपासून घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढला आहे.
सातारा जिल्ह्यातील १0५ सहकारी संस्थांबरोबरच कृष्णा साखर कारखाना, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यामुळे आता सहकारातील निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकालानंतर सरपंच निवडणुक प्रक्रिया पूर्ण होताच आता अनेक महिने रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आल्याने आता इच्छुकांचे व गटनेत्यांनी आपले राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.
राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. १८ मार्च २0२0 रोजीच्या आदेशान्वये १७ जून २0२0 पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. तथापी कोरोनाचे सावट कायम राहिल्याने दि. १७ जून रोजी पुन्हा आदेश काढून निवडणुका दि. १६ सप्टेंबर २0२0 पर्यंत तसच दि. २८ सप्टेंबर २0२0 ला आदेश काढून दि. ३१ डिसेंबर २0२0 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३१ मार्च २0२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
दरम्यान, डिसेंबरमध्ये राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरु करण्याची विनंती सहकार विभागाकडे केली आहे. याचा विचार करुन राज्य शासनाने दि. १६ जानेवारी २0२१ रोजीचे आदेश रद्द करुन ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून कोव्हीड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन सहकार संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
आता करोनाची स्थिती सावरली असून प्रतिबंधीत लसही उपलब्ध झाली आहे त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीस प्रारंभ करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील तब्बल ६0 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका साधारणपणे २0२१ पर्यंत संपविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अंतीम मतदार यादी ही संस्था कार्यालय किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथील नोटीस बोर्डवर दि. १५ फेब्रुवारी रोजी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्राधिकरणाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रथम टप्प्यातील संस्थांची निवडणुक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु करावी. त्याचबरोबर जिल्हा निवडणुक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणुक मुदतीत पूर्ण करावी. निवडणुकीवेळी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंक करणे बंधनकारक राहणार आहे. जिल्हा निवडणुक आराखड्यातील दोन ते सहा टप्प्यातील निवडणुकीस पात्र संस्थांच्या प्रारुप मतदार याद्या तयार करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जातील. निवडणुकीसाठी शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. निवडणुकीच्या दृष्टीने नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा स्वतंत्र जाहीर करण्यात येणार आहेत.