कोल्हापूर – कणकवली येथे अमित शहा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत अमित शहा यांनी आश्वासन दिले ते खरे असावे. कारखानदारांच्या बाबतीत शहा इतके धादांत खोटे बोलत असतील तर शिवसेना आणि भाजपमध्ये काय झाले असेल? त्याबाबतही शहा खोटेच बोलत असतील, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगाविला.
कोल्हापूरात ते बोलत होते. हसन मुश्रीफ म्हणाले, अमित शहा यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून आले आहे. भाजप सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत. अमित शहा यांनी आरोप केला आहे की, भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे, परंतु तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवे होते. त्यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थकहमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपच्या एका तरी कारखानदाराने सांगावे की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत. कदाचित त्या कारखानदारांना अमित शहा यांच्याकडून पैसे घ्यायचे असतील, म्हणूनच त्यांनी हा बनाव सुरु केला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.