चेन्नई – तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या प्रभावी नेत्या दिवंगत जयललिता यांच्या विश्वासू सहकारी व्ही. के. शशिकला यांची बेंगळुरू येथील तुरुंगातून सुटका होऊन त्या चेन्नईमध्ये पोचल्या आहेत. बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
आता त्या तमिळनाडूत पुन्हा सक्रीय होऊ लागल्याने अण्णाद्रमुकमधील अनेक नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शशिकला यांनी या नेत्यांना उपकृत करून अनेक फायदे मिळवून दिलेले आहेत आणि त्यांनी ठरवले तर ते आपले निवडणुकीतील राजकारण मातीमोल करू शकतात अशी भिती या नेत्यांना वाटत आहे.
एक विनोदी स्तंभात गेल्या आठवड्यात कमलहसन यांच्या चित्रपटातील धैर्यावरील तमीळ भाषेतील संवाद देण्यात आला होता. त्याचा अर्थ असा आहे की, धैर्य म्हणजे काय तुम्हांला माहिती आहे का? धैर्य म्हणजे आपण अजिबात घाबरलो नसल्याचा अभिनय करणे. अशा परिस्थितीत अण्णाद्रमुकचे चार वरिष्ठ नेत्यांचा गेल्या आठवड्यातील अभिनय अगदीच सुमार ठरल्याची टीका प्रसिद्ध वर्तमानपत्रातील स्तंभात करण्यात आली आहे.
पक्षाच्या अध्यक्षीय मंडळाचे चेअरमन ई. मधुसूदन, उर्जामंत्री पी. थंगमणी, मत्स्य विकास मंत्री डी. जयकुमार आणि कायदामंत्री सी. व्ही. षण्मुगम यांची नावे घेऊन ही टीका करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात राज्याचे पोलिस महासंचालक जे. के. त्रिपाठी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना चौघेजण पहिल्यांदा कुणी बोलायचे याबाबत एकमेकांना आग्रह करत होते आणि त्यांची ती कुजबूज समोरील माईकमधून सगळ्यांना ऐकू येत होती.
कुणीही पहिल्यांदा बोलायला तयार नव्हते आणि नंतर शशिकला यांचे नाव घेताना त्यांची जीव खालीवर होत असल्याचे दिसले. हा सगळा विनोदी प्रसंग नंतर नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर साजरा केला. गंमत म्हणजे शशिकला आणि त्यांचा पुतण्या टीटीव्ही दिनकरनने मानवी बॉम्बच्या मदतीने राज्यभर हिंसाचार घडवून आणण्याची योजना आखली असल्याची तक्रार करण्यासाठी या चार नेत्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांची भेट घेतली होती.
अण्णाद्रुमकाच्या नेत्यांनी शशिकला यांची तक्रार करण्यासाठी राज्याच्या पोलिस प्रमुखांची भेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी बेंगळुरूमधील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गाडीवर अण्णाद्रमुक पक्षाचा झेंडा लावल्याबद्दल शशिकला यांची तक्रार करण्यासाठी अण्णाद्रमुकचे नेते पोलिस प्रमुखांना भेटले होते. ही तक्रार म्हणजे चार वर्षाच्या मुलाने त्याने माझ्यासारखेच आईस्क्रीम घेतले म्हणून वडिलांकडे तक्रार करण्यासारखे होते.
नंतर दोन दिवसांनी जयकुमार यांना बळ आले आणि ते म्हणाले की, शशिकला यांच्या मागे कितीही आमदार असले तरी त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाला धक्का बसणार नाही. सध्या तमिळनाडूत अनेक राजकीय नेत्यांच्या फ्लेक्सवर शशिकला यांचे छायाचित्र जयललिता यांच्यापेक्षा मोठ्या आकारात दिसू लागले आहे. शशिकला यांनी ठरवले तर त्या अण्णाद्रमुकच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील व्यूहरचनेला सुरूंग लावू शकतात याची जाणीव पक्षातील प्रमुख नेत्यांना झालेली
आहे. त्यांचा पुतण्या दिनकरन यांना मात्र शशिकला यांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत असे वाटते.
अर्थात ते कितपत शक्य आहे हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे कायद्यानुसार त्या पुढील सहा वर्षे कुठलीही निवडणूक लढवू शकणार नाहीत किंवा घटनात्मक पदावर त्यांची नियुक्ती होऊ शकणार नाही. पण त्यामुळे त्यांची ताकद कमी लेखता येणार नाही हे निश्चित.
शशिकला या थेवर समाजातील आहेत आणि त्याची समाजावर चांगली पकड आहे. थेवर समाज हा परंपरेने अण्णाद्रमुकचा पाठीराखा मानला जातो. असे असले तरी शशिकला यांच्या ताकदीची मोठी भिती बाळगून अण्णाद्रमुकचे नेते सैरभैर झाल्याचे दिसत आहे. हे सगळे पाहणाऱ्या एका बड्या नोकरशहाच्या मते अण्णाद्रमुकमध्ये किती वाकायचे याचा निर्देशांक ठरलेला आहे.
तुमचे पद राखण्यासाठी तुम्ही पक्षाच्या प्रभावी नेत्यासमोर 45 अंशात वाकणे बंधनकारक असते. 90 अंशात वाकलात (म्हणजे शब्दशः जमिनीवर लोटांगण) तर तुम्हांला आणखी चांगले पद मिळणार. पण तुम्ही 180 अंशात वळलात म्हणजे नेत्याला पाठ दाखवलीत तर तुमचे निर्वाण ठरलेले आहे.