नवी दिल्ली – सरकारने पोलीस व निमलष्करी दलाचा वापर करून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना तेथून जबरदस्ती हलवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जेलभरो आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे. या पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय सिंह म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आमची पूर्ण ताकद उभी करू.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राकेश टिकैत यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी टिकैत यांनी सरकारने आंदोलकांचा पाणीपुरवठा तोडला असल्याची तक्रार केली. शेतकऱ्यांसाठी तेथे लावण्यात आलेले फिरते संडासही काढून घेण्यात आले होते. त्यामुळे सरकारने तेथे शेतकऱ्यांची चारही बाजूने कोंडी केली असून आम्ही हा विषय संसदेत उपस्थित करू असे खासदार संजयसिंह यांनी यावेळी नमूद केले.