गाझीयाबाद – गाझीपूर सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न काल पोलिसी बळावर करण्यात आला. पोलिसांनी तेथील शेतकऱ्यांना हुसकावून लावले, तसेच पोलिसांनी तेथील आंदोलकांच्या स्टेजचाही कब्जा घेतला होता. त्यामुळे गाझीपूर सीमेवरील आंदोलन रात्रीच पोलिसी बळावर गुंडाळले जाणार असे मध्यरात्रीचे चित्र होते.
पण या कारवाईमुळे संतप्त झालेले किसान नेते राकेश टिकैत यांना तेथे रडू कोसळले. त्यांनी मी आत्महत्या करून मरणे पसंत करीन पण येथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आंदोलन स्थळावरून घरी परतलेले शेतकरी रातोरात मोठ्या संख्येने पुन्हा आंदोलनस्थळी परतल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुन्हा संजीवनी मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आंदोलक नेत्यांना नोटिसा बजावून हे ठिकाण खाली करण्यास सांगण्यात आले होते.
राकेश टिकैत यांच्या आवाहानानंतर मीरत, बागपत, बिजनौर, मुज्जफरनगर, मोरादाबाद आणि बुलंदशहर या भागातून शेकडो शेतकरी आज सकाळी पुन्हा आंदोलनस्थळी परतले. 26 जानेवारीच्या प्रकारानंतर अनेक शेतकरी तेथून आपल्या गावी परतले होते.
तशातच पोलिसांनी काल बळाचा वापर सुरू केला आणि तेथील पाणी आणि वीजही कापली होती. त्यामुळेही हे आंदोलन काल रात्रीच गुंडाळले जाईल असे वाटले होते. पण मध्यरात्री दोनच्या सुमाराला तेथील पोलीस बळ कमी करण्यात आले. तोपर्यंत शेतकरीही मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी परतले. दरम्यान, शेतकऱ्यांचा तेथील कडवा निर्धार लक्षात घेऊन आज तेथील वीज व पाणी पुरवठाही पूर्ववत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गाझीयाबादचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखही काल रात्री आंदोलनस्थळी गेले होते. तेथे मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलाच्या व रॅपिड ऍक्शन फोर्सच्याहीं तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रात्री तेथे मोठ्या प्रमाणात तणावर निर्माण झाला होता. तथापि आज सकाळी पुन्हा तेथे शेतकरी आंदोलकांची संख्या वाढल्यामुळे आंदोलनाची तेथील धग कायम राहिली आहे. सिंघु आणि टिकरी बार्डवरही या घडामोडींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडून तेथील ढिले पडलेले आंदोलनही पुन्हा जोर धरू लागल्याचे वृत्त आहे.