कराड, (प्रतिनिधी) – दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे विविध मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यातील शेतकर्यांनी बाजार समितीच्या आवारात मंगळवारी आंदोलन करून, राज्य सरकारच्या प्रस्तावित पणन कायद्याविरोधात निदर्शने केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर बाजार समितीच्या आवारात आंदोलन करण्यात आले.
बाजार समितीचे सभापती राजू कदम, इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, काँग्रेसचे कराड उत्तर अध्यक्ष निवासराव थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरराव खबाले, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, नानासाहेब पाटील, सुभाषराव यादव, संतोष जगताप, राजेंद्र चव्हाण, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, अजितराव पाटील, शिवाजीराव जाधव, सुरेश पाटील, उमेश मोहिते, सुरेश भोसले व बाजार समितीचे संचालक सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकर्यांनी 2022 पासून जवळपास दीड वर्ष आंदोलन केले होते. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले होते. त्याच वेळी 21 पिकांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर-खेरीच्या घटनेत मृत पावलेल्या शेतकर्यांच्या वारसांना नोकरी आणि जखमींना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या मागण्या अजूनही पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. त्यानंतर शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमेवर पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला कराड तालुक्यातील शेतकर्यांनी पाठिंबा दिला.
याबाबतचे पत्र दिल्लीतील आंदोलकांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या प्रस्तावित पणन कायद्यानुसार जनतेतून निवडून आलेले संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली जाणार आहे. या कायद्याला राज्यातील सर्व बाजार समित्यांनी विरोध केला आहे. कराड बाजार समितीतही याला विरोध दर्शवण्यात आला. निवासराव थोरात, अजितराव पाटील व शेतकरी प्रतिनिधींची भाषणे झाली.