मुंबई – देशातील लसीकरण मोहिमेत “सीरम’चा सिंहाचा वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली असून एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, बांधकाम सुरु असून विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. नेमकं काय काम सुरु होते याची माहिती येईल. तसेच मी प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती घेतली असून अग्निशन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कामगिरी कौतुकास्पद आहे.
दरम्यान, यावेळी विरोधक यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचे ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. तसेच त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.