strong>सातारा – मरीआईचीवाडी (ता.खंडाळा) येथे मृत कोंबड्या आढळून आल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला होता. भोपाळ येथील राष्ट्रीय पशुरोग प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे मरीआईचीवाडी येथील मृत कोबड्याना बर्ड फ्लूच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारा जिल्ह्यात बर्ड प्लुचा शिरकाव झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
लोणंद नजीक मरीआईचीवाडी येथे सुमारे 90 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर याठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने नमुने घेण्यात आले होते. पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागास एक हजार पीपीई किट, एक हजार फेसशील्ड, हॅन्ड ग्लोज व इतर आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले होते.
मरीआईचीवाडी येथील नमुण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.हणबरवाडी (ता.कराड) येथील अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये सध्या एकुण ५० शिघ्र कृती दल कार्यरत आहेत.
या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच रोगप्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधित प्रक्षेत्रावर करावयाच्या कार्यवाहीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अंकूश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय शिंदे,डॉ.संतोष वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहेत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शीघ्र कृती दलाची नियुक्ती करण्यात आली आहे.