मनाचेच मनाशी केलेले हितगुज किंवा ते करताना मनाला आलेल्या नखशिखांत भानाने मला आयुष्याची सम मिळवून दिली. अनुभवलेले क्षण आणि अनुभवांनी, प्रसंगांनी सजलेले अनेक अस्थायी अंतरे त्यांच्या सुखदु:खाच्या आरोह, अवरोहांनी सजत गेले. मी साठवत राहिले त्यांच्या ठुमऱ्या, तोडे आणि आलापी एखाद्या शागिर्दासारखे. या क्षणांनी, प्रसंगांनी मला आयुष्याकडे बघण्याची नजर दिली आणि भानही दिले. एका साध्या अल्लड शब्दात जन्मल्यावर हे भान कधी सापडायचे तर कधी निसटून जायचे… अलगद, नकळत. त्यालाच मी नाव दिले सृजनभान.
मला आभाळ खूप आवडतं. मी आकाश नाही तर आभाळ म्हणतेय. कारण आकाश अमर्याद आहे, पण आभाळ मनात वसतं. माझ्या गॅलरीच्या खिडकीतून एक आभाळाचा तुकडा मला दिसतो. त्याचं आणि माझं मैत्र तसं अलीकडचंच, पण तरीही खूप जुनं असं त्या आभाळाशी बोलताना माझ्या मनातलं आभाळ उमलत गेलं आणि भेटत गेल्या सरी रंग-उमलत्या मनाच्या… आभाळाचंच सृजन झालं आणि मी शब्दरूपांत मांडत गेले मला आलेलं भान. कारण त्या भानानंच मला नवी दृष्टी दिली माझ्या स्वत:कडे बघण्याची… सकाळ जागी होते… पापण्यांची लड उलगडून असं म्हणताना मीच तर ती सकाळ असते… जी माझ्या खिडकीतल्या गुलाबांवर धुक्याची रजाई पांघरते… आणि मग त्या धुक्यातच मला मनात वितळणारा समुद्र दिसतो. निळा, पाळढरा, आकाशी… त्यातून लपंडाव खेळणारी एखादी पहाट चांदणी; जी अनुष्का होऊन माझ्या कवितेत रेंगाळते आणि खिडकीत सकाळी घुमणारे गुंजेच्या डोळ्यांचे पारवे मला खुणावतात.
कधी काऊ येऊन साद घालतो. अस्वस्थ… त्याचवेळी दूरवर मंदिरातला घंटा ऐकू येतो. कधी सावळा पाऊस तर कधी दवांची पैंजणं… कधी शिशिरातली वृद्ध पानगळ लिहिता लिहिता मी लिहीत गेले तुझे निखालस रूप तरीही… काहीतरी अधुरेच राहते प्रत्येकवेळी… माझे विचार बुडतील इतकी खोल हवी कविता… माझं सगळं जग त्या आरस्पानी आभाळाभोवती फिरतं… कधी अवेळी येणाऱ्या पावसात भिजताना ती चौकट मला राजमहालाची खिडकी वाटते. खास बिलोरी ऐने मढवलेली… राजमहालातली गुपितं आपल्या पोटात लपवणारी… सांजेच्या चिमण्या जेव्हा तिच्या गजांवर रेंगाळतात तेव्हा लाजणारी, तर कधी सांजेच्या स्पर्शाने अधीर झालेली राधाच जणू. अशा कल्पना मी त्या आभाळाच्या कॅनव्हासवर रेखाटत राहते.
कधी कल्पनेत रमताना जाणवतं, सारीच अक्षरं स्वप्निल होत जातात. कागदावर उतरताना मनात सांजेचं गारुड कधीच उतरायला सुरुवात होते. तेव्हा मी डोळे बंद करून घेते आणि सोडून देते मनाला सांजेच्या ओंजळीत. सांज माय होऊन मला कुशीत घेते. तिच्या केशरात रंगलेल्या कातरवेळेच्या पदरात लपवते. उघडली जातात मग आठवणींची कवाडं आणि एकामागोमाग एक कहाण्या उलगडत जातात. शब्द, अक्षरे, उकार, वेलांट्यांचे खेळ खेळू लागतात. सांज रंगू लागते तेव्हा आभाळाच्या कोपऱ्यात इकडे तिकडे विखुरलेले शब्दपक्षी जमू लागतात त्यांच्या नव्या अनुभवांसह. नव्या जाणिवा, नव्या कल्पना मनात उमटू लागतात.
कधी कधी वाटतं, कोणी विरहिणी दूरवरच्या बारादरीत बसून मारवा गातेय आणि ते मखमली सूर वाऱ्याबरोबर वाहात येऊन माझ्यापर्यंत येत आहेत. तिचे ते सूर तनामनात निथळत राहतात मूकपणे. काषाय सोनेरी रंगाची ही भावविभोर सांज कोणाची तरी सय मनाला देऊन जाते. त्याक्षणी मनाचे मोर चकोर होतात. कोणा सावळ्याची निळसर प्रकाशआभा आसमंतात झिरपू लागते. कुणाचे तरी गहिरे अथांग डोळे आठवतात. पापण्या मिटल्यावर, भरून राहतो कल्पनेचा अनाहत ध्वनी मग आसपासच्या आसमंतात. जाणिवेच्याही पल्याड वाहणारा संवेदनांचा प्रकाशझरा वाहात जातो आणि सांजेच्या या निलवर्णात विलीन होतो. मल्हाराची धून मनात सचेत होते.
अविरत पापण्या झरत राहतात. मनात लागलेल्या षड्जासोबत सूचत राहतात मला विरघळत नेणाऱ्या ओळी… आसवांत थरारते, एक हसूची चांदणी आणि पल्याड नदीच्या कुणी गातसे विराणी या हितगुजातूनच मला सूचत जातात; शब्दांच्या वेलबुट्ट्या. मग ती ओल्या घनाची सावली असो की भिजलेल्या जुईची. मी मनावर पाघंरत राहते आणि स्वप्निल डोळ्यांनी आभाळाला कवेत भरून घेते. काही नाचरे कवडसे सोबतीला येतात. लहानमोठे, नाचरे, लाजरे कवडसे आणि त्यांच्यासोबत खेळणारी धुळीची बाळं मला आवडतात. लहानपणापासूनच माझे या कवडशांशी नाते जोडले गेलेय. भरलेल्या मनाचे कप्पे रिकामे करतानाही हे कवडसे शब्दांमध्ये रेंगाळतात. जपले जातात त्यांना नव्हाळीचे ऊन्ह दाखवून.
कातरवेळची चांदणी नभ माळून घेताना मला दिसते अंगणातल्या ओट्यावर, तुळशीपुढे लावलेली इवलिशी पणती, जी अंधाराशी जोडलेले नाते जपताना पूर्ण समर्पित होते त्या अंधारालाच. कसं असतं ना? एकदा नातं जोडलं गेलं ना, की ते जपलं जातंच. पणतीच्या शेजारी बसताना मीही साठवत राहते तिचे समर्पण माझ्याही नात्यात.
सुमद्राच्या; आभाळात वितळलेल्या छटा दिसतात मला त्या पणतीच्या तेजामध्ये आणि एक स्पर्शविहिन शहारा फुलतो आजूबाजूच्या तमगर्भात. ते मावळते विजन माझेच तर मनाचे कंगोरे असतात, कातरलेले. त्या मावळत्या संध्याकाळी माझे मनाचे हितगुज चालूच राहते. मनाच्या मनाशी आणि धुमारे फुटतात रातराणीला पहिल्या प्रहराच्या नांदीन… आभाळ गालात हसतं तेव्हा… शुभ्र आभाळ रंग बदलतं; निळाईचे मंदिल बांधून चालू लागतं चांदणमहालाची वाट… पहाटेच्या कुशीत पुन्हा उगवून येण्यासाठी… या आभाळाची मी कायमच ऋणी राहीन, ज्याने मला कविता जगायला शिकवले, कवितेचे भान दिले. मला रुजवले, फुलवले, उमलवले, सृजनशील बनवले. माझे हे आलेले कवितेचे भानच सर्जन करणारे सृजनभान आहे.
मानसी चिटणीस