गोष्ट तशी जुनी आहे. जुनी म्हणजे अगदीच साताजन्मापूर्वीची नव्हे. दहा पंधरा वर्षे मागची गोष्ट आहे. दर वर्षीप्रमाणे मुलाचा वाढदिवस होता. हिंदू संस्कृतीत केक कापणं, ज्योत विझवणं या गोष्टी अशुभ मानल्या जातात. त्यामुळे आमच्या घरात केक आणला जायचा नाही. त्यामुळेच त्यावर असणारी मेणबत्ती विझवण्याची वेळ यायची नाही. आमच्याकडे वाढदिवसाला मुलाला नवे कपडे घेणं. त्याचं औक्षण करणं एवढंच व्हायचं. घराचा सोहळा असावा तशा शेजारणी काम करायला यायच्या.
भेळ, इडली, डोसे, उत्तपे असे पदार्थ घरातच बनवले जायचे. अगदी गुलाबजामसुद्धा घरातच तयार व्हायचे. तयारी झाली की शेजारणी घरी जायच्या. पुन्हा नटूनथटून यायच्या. आपापल्या मुलांना पुढं घालून आणायच्या. बाळ गोपाळ जमिनीवर कोंडाळं करून बसायचे. निरंजन ओवाळून औक्षण व्हायचं.
साठ-सत्तरच्या दशकात जी पिढी जन्माला आली आहे त्यातील बहुतेकांना तर वाढदिवस ही संकल्पनाच माहीत नसावी. वर्ष यायची आणि जायची म्हणून ती पिढी मोठी झाली. परंतु मोठं होण्याच्या त्या वाटेवर वाढदिवस यायचेच नाहीत. आईबाबा नवे कपडे घ्यायचेच असं नाही.
कुणी औक्षण करायचं नाही. सवंगडी जमायचे नाहीत. भेळपुरी व्हायची नाही. भेट म्हणून खेळणी यायची नाहीत. मुळात त्या पिढीला खेळणी अशी फारशी माहीत नव्हतीच. भोवरा, गोट्या, विटी-दांडू, लंगडी-पाणी, लगोरी हेच त्यांचे खेळ. व्यापार हा खेळ घरात असणं म्हणजे फारच प्रतिष्ठेचं मानलं जायचं.
वाढदिवस तर साजरा व्हायचा नाहीच परंतु वाढदिवसाच्या दिवशीच बाबांच्या हाताखालून जाणं आणि उपाशी राहणंसुद्धा नशिबी यायचं. त्याकाळी नव्या कपड्यांची खरेदी वर्षातून एकदाच व्हायची. दिवाळीला. नवे कपडे मिळण्याची आणखी एक शक्यता म्हणजे शाळेचा गणवेश. अर्थात तो प्रत्येक वर्षी नवा नाही. आधीचा गणवेश अगदीच गलितगात्र झाला असेल, हातघाईला आला असेल तरच नव्या ड्रेसची खरेदी. नव्या ड्रेसच्या आधी दाभणाने पोतं शिवावं तसं शक्य तोवर त्या ड्रेसला शिवणकाम केलं जायचं. आपल्या मुलाला इतर मुलं नावं ठेवतील याचा विचार न करता ठिगळाचा पर्यायसुद्धा अमलात आणला जायचा.
नंतर मात्र वाढदिवस आले. श्रीमंतांपासून गरिबांच्या घरापर्यंत साजरे होऊ लागले. औक्षण मागे पडलं. केक कापले जाऊ लागले. मेणबत्त्या विझवल्या जाऊ लागल्या. पाश्चात्य “बर्थ डे सॉंग’ म्हटलं जाऊ लागलं. चमचमीत कागदात गुंडाळलेले गिफ्ट भेट येऊ लागले आणि कधी कसा कुणास ठाऊक पण त्यात “रिटर्न गिफ्ट’चा शिरकाव झाला.
बाराण्याच्या बदल्यात चाराण्याची वस्तू भेट दिली जाऊ लागली. डोक्यावर कागदी विदुषकी टोप्या घातल्या जाऊ लागल्या. हळूहळू गिफ्ट भारी की रिटर्न गिफ्ट भारी अशी चढाओढ होऊ लागली. वाढदिवसातलं पावित्र्य हरवलं. औक्षण हरवलं. वाढदिवस हा इव्हेन्ट झाला. हॉल बुक होऊ लागले. भव्यदिव्य सजावट होऊ लागली. पगंती झडू लागल्या. वाढदिवसाचं कौतुक कमी आणि देखाव्याचा सोस अधिक झाला.
कोणी आणली असेल ही “रिटर्न गिफ्ट’ची कन्सेप्ट? का आणली असेल? मला वाटतं “रिटर्न गिफ्ट’ मागे कोणाचातरी व्यापारी मेंदू असावा. सर्वात आधी कोणा एखाद्या व्यापाऱ्याने भेटवस्तू घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला भेटवस्तू दिली असावी. त्याचं बघून दुसऱ्याने तसं केलं असेल. मग तिसऱ्याने. मग हळूहळू प्रत्येक घरात ही रिटर्न गिफ्टची चाल घुसली. मग लग्नकार्यातसुद्धा ही रिटर्न गिफ्टची प्रथा रुजली. विवाहकार्याला आलेल्या प्रत्येकाला आहेर होऊ लागला. टोपी-उपरणं जाऊन, टॉवेल-टोपी आली.
प्रत्येक महिलेला साडी आली. ही साडी असते दीडशे दोनशे रुपयाची. शक्यतो न वापरण्याजोगी. किंवा फारफार तर घरकामात वापरण्याजोगी. अगदी जवळच्या नात्यातल्या स्त्रीला भारी साडी, थोड्या दूरच्या नात्यातल्या स्त्रीला त्यापेक्षा हलकी साडी आणि नातंगोतं नसलेल्या स्त्रीला अगदीच पोतेरं दिला जाऊ लागलं. किंमत कळू नये म्हणून किमतीची लेबलं काढून टाकली जाऊ लागली.
देणाऱ्याला दिल्याचं कौतुक असतंच. पण घेणाऱ्याला कौतुक असेलच असं नाही. काय तरी बाई पोतेरं दिलंय? नसतं दिलं तरी चाललं असतं ना. असेच सूर चारचौघींच्या बैठकीत उमटतात. आशीर्वाद देणं घेणं दूर राहतं. भेटवस्तूंचेच अधिक कौतुक होतं.
घेणाऱ्या माणसाचे हात आभाळाएवढे असतात. पण देणाऱ्या माणसाचे हात मात्र चिमूटभर होतात. माणूस माणसाकडून घेताना विचार करत नाही. पण देताना मात्र फार विचार करतो. स्वतःच्या सुखासाठी तो हवे तसे पैसे उधळेल. परंतु दुसऱ्याच्या सुखासाठी पुढाकार घेताना त्याला व्यवहार कळतो. हॉटेलात जेवताना माणूस विचार करत नाही.
हजारच्या जागी दोन हजार रुपयांचं बिल भरताना त्याचे हात थरथरत नाहीत. परंतु दहा रुपयाची भाजीची गड्डी आठ रुपयात मिळावी अशीच त्याची अपेक्षा असते. माणूस हा स्वतःच्या परिघासाठी जगणारा आहे. दुसऱ्यासाठी जगणाऱ्या विभूती निराळ्याच. पण दुसऱ्यासाठी जगणाऱ्या विभूतींविषयी बोलताना समाज “त्याला व्यवहारज्ञान नाही’ असंच म्हणतो. देणं एवढंच जड होत असेल तर माणसाने माणसाला काही देऊच नये आणि कोणाकडून काही घेऊ देखील नये.
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हातचं घ्यावे’
असं विंदा म्हणाले. परंतु माणसाला ढगाकडून वेडेपिसे आकार घेता आले नाहीत. सह्याद्रीच्या कड्यासारखी ढाल होता आलं नाही. समुद्रासारखी फेसाळणारी आयाळ होता आलं नाही आणि भीमेच पावित्र्य देखील होता आलं नाही. देणाऱ्याचे हात असे रिटर्न गिफ्टच्या स्वरूपात आकार घेतील याची विंदांना सुद्धा कल्पना नसावी.
सोबत नेता येत नाही तरी माणसाला धन गोळा करण्याची हौस असते. स्वतःची श्रीमंती मिरवण्यात त्याला धन्यता वाटते. सोन्याने मढवलं म्हणून देहाचं आयुष्य वाढत नाही. माणसाने माणसाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेलच तर प्रेमाच्या बदल्यात प्रेम द्यावं. घासाच्या बदल्यात घास द्यावा. तेव्हाच रिटर्न गिफ्ट या संकल्पनेला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल.
विजय शेंडगे