नवी दिल्ली – मोदी सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये उद्या (शुक्रवार) चर्चेची नववी फेरी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सकारात्मक चर्चा होण्याची आशा व्यक्त केली. तर, आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी चर्चाप्रक्रिया सुरू राहण्याची गरज असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले.
केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू केलेल्या आंदोलनाला 50 दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. आंदोलनाची कोंडी फोडण्याच्या उद्देशातून आतापर्यंत सरकार आणि शेतकरी नेत्यामंध्ये झालेल्या चर्चेच्या आठ फेऱ्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढे सरसावले.
न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. तसेच, कोंडी फोडण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली. त्यानंतर सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पुढील चर्चा होणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आधी ठरल्याप्रमाणे चर्चेची नववी फेरी होणार असल्याचे सरकार आणि शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमधून बाहेर पडण्याच्या भुपिंदरसिंग मान यांच्या निर्णयाचे शेतकरी नेत्यांनी स्वागत केले. आम्हाला कुठली समिती नकोय. त्यामुळे इतर तीन सदस्यांनीही मान यांच्यासारखी कृती करावी.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. तसे असले तरी, न्यायालयाने नियुक्त केलेली समिती आपले कामकाज सुरू करणार असल्याचे समजते. त्या समितीची पहिली बैठक 19 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.