नवी दिल्ली – यंदाचा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा परदेशी प्रमुख पाहुण्याविना साजरा होणार आहे. जागतिक करोना संकटामुळे पन्नास वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर प्रथमच ती प्रथा मोडली जाणार आहे.
देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा (26 जानेवारी) मुख्य सोहळा होतो. त्या सोहळ्यासाठी दरवर्षी प्रमुख पाहुणा म्हणून इतर देशाच्या प्रमुखाला निमंत्रित केले जाते.
त्या प्रथेनुसार यंदाच्या सोहळ्याचे निमंत्रण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना देण्यात आले. ते निमंत्रण जॉन्सन यांनी स्वीकारले. मात्र, काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये करोनाचा नवा अवतार समोर आला. त्यामुळे त्या देशातील करोना संकट आणखी गहिरे बनले.
त्यातून ब्रिटनमध्येच थांबण्याची आवश्यकता अधोरेखित करत जॉन्सन यांनी नाईलाजाने भारत दौरा रद्द केला. त्यानंतर जागतिक करोना संकटाचा विचार करून इतर देशाच्या प्रमुखाला यंदाच्या सोहळ्यासाठी निमंत्रण न पाठवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्याविषयीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरूवारी दिली.