कोल्हापूर – नवीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी दीड महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत आणि पावसात दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तापमान दीड डीग्री सेल्सिअसपर्यंत गेलेले असतानाही सुरू असलेल्या या आंदोलनात 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला.
मात्र, तरीदेखील केंद्र सरकारला दया आली नाही, अशा शब्दांत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा चालवली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, केंद्रातल्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना खालिस्तानी असे संबोधले आहेत. त्यांना पाकिस्तानचा व चीनचा पाठिंबा हे अशी मुक्ताफळेही त्यांच्याकडून उधळल्यात आली आहेत. मात्र आज खऱ्या अर्थाने न्याय देवतेने शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यामुळे न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.