मुंबई – भारतीय नौदल आणि तटरक्षक दल उद्यापासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या दोन दिवसीय किनारपट्टी सुरक्षा सरावात सहभागी होणार आहेत. किनारपट्टी सुरक्षा व्यवस्थेला मजबुती देणे हा त्या देशव्यापी कवायतींमागील उद्देश आहे.
दर दोन वर्षांनी घेतला जाणारा देशातील सर्वांत व्यापक आणि दुसरा सराव किनारपट्टीलगत असणाऱ्या सर्व 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होईल. त्या महाप्रंचड सरावाला सी व्हिजिल (सागरी पहारा) असे नाव देण्यात आले आहे. त्या सरावात हवाई दल, एनएसजी, बीएसएफ, पोलीस, सीआयएसएफ, सीमा शुल्क विभागाचेही योगदान असेल.
देशाला लाभलेल्या 7 हजार 516 किलोमीटर किनारपट्टीलगत तो सराव होईल. सागरी सुरक्षेपुढील आव्हानांचा विचार करून सरावाची आखणी करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेशी संबंधित घटकांमधील समन्वय, गुप्तचरविषयक माहितीची देवघेव, धोक्याची सूचना तत्परतेने देऊ शकणाऱ्या मासेमारी समुदायाचा प्रभावीपणा आदींची चाचपणी सरावावेळी होईल.
सरावासाठी तांत्रिक पायाभूत सुविधांचा वापर केला जाणार आहे. किनारपट्टी सुरक्षाविषयक त्रुटी जाणून घेण्यास संबंधित सराव उपयोगी ठरणार आहे.