नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन कृषी विषयक कायद्यांच्या विरोधात दिल्लीत धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात सरकार बरोबर आज चर्चेची आठवी फेरी झाली. परंतु या चर्चेतही दोन्ही बाजू आपापल्या पुर्वीच्याच भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणताच तोडगा निघू शकला नाही. चर्चेची पुढील फेरी आता 15 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.
नीयत साफ़ नहीं है जिनकी,
तारीख़ पे तारीख़ देना स्ट्रैटेजी है उनकी!— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 8, 2021
चर्चेची 8वी फेरीही ‘निष्फळ’ ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ट्विट करत टीका केली आहे. राहुल गांधीनी म्हटले आहे की, केंद्र सरकारची नीयत साफ नाही. त्यामुळेच तीन कृषी विषयक कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात अजूनही तोडगा निघाला नाही. तारखेंवर-तारीख देणे हीच केंद्र सरकारची रणनीती आहे.
यासंदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर “नीयत साफ़ नहीं है जिनकी, तारीख़ पे तारीख़ देना स्ट्रैटेजी है उनकी” असे ट्विट करत केंद्र सरकारवर निशाना साधत आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीत फार काळ चर्चा झाली नाही. या प्रकरणात सुप्रिम कोर्टात 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे, ती लक्षात घेऊन चर्चेची पुढची फेरी 15 जानेवारीला ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आजच्या बैठकीत सरकारने अशी भूमिका घेतली की सरकारने केलेल्या या कायद्यांचे देशातील बहुतांशी शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी देशाच्या अन्य भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आणि व्यापक देश हित लक्षात घेऊन हे आंदोलन मागे घ्यावे.
कृषी मंत्री तोमर यांनी कायद्यातील तरतूदींविषयी आपण चर्चा करू असे शेतकऱ्यांना सांगितले पण शेतकरी प्रतिनिधींनी हे कायदेच रद्द करा अशी आपली भूमिका कायम ठेवली. तुम लॉ वापसी करो हम घर वापसी करेंगे असे या प्रतिनिधींनी सरकारला सांगितले. तसेच तुम्हाला हा पेच सोडवण्याची इच्छा नसेल तर आम्हाला तसे स्पष्ट सांगा विनाकारण वेळ का वाया घालवायचा असेही एका शेतकरी नेत्यांने यावेळी संबंधीत मंत्र्यांना सुनावले.