नवी दिल्ली – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला जातो आहे व घोषणा दिल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. पंतप्रधान ही एक व्यक्ती नसून एक संस्था आहे व त्यांच्याबाबत असे शब्द वापरले जाणे अयोग्य असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.
देशवासियांना पंतप्रधानांवर प्रेम केले आहे व त्यांचे समर्थन केले आहे. सहा वर्षे ते देशाचे पंतप्रधान आहेत व त्यापूर्वी 14 वर्षे गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर निराधार आरोप केले जात आहेत. याचे काही औचित्य आहे का? किमान माझ्या राजकीय आयुष्यात तरी मी एखाद्या पंतप्रधानांच्या विरोधात इतक्या आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केलेले ऐकले नसल्याचे राजनाथ म्हणाले.
पंतप्रधानांच्या विरोधात मर जा, मर जा असे नारे दिले जातात. हे अत्यंत दु:खद असून शेतकऱ्यांनी अशा अपमानजनक शब्दांचा वापर करणाऱ्यांपासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पंतप्रधान या पदाची प्रतिष्ठा कायम राखली जाणे हे विरोधी पक्षांचेही कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षांचीही एक जबाबदारी असते.
मी त्यांना सल्ला देणार नाही. मात्र घटनात्मक संस्थांचा आदर राखला जायला हवा. कारण या संस्था दुबळ्या झाल्या तर लोकशाही देखिल दुबळी होते. आपण स्वत: कोणत्याही पंतप्रधानांच्या विरोधात कोणत्या आक्षेपार्ह शब्दांचा कधीच प्रयोग केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनापासून शेतकरी आणि गरीबांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नरसिंह राव असोत, देवेगौडा असोत वा अन्य कोणीही पंतप्रधान असोत आम्ही त्यांच्या पदाचा कधीच अवमान केला नाही. अनेकदा पक्ष हिताकडे दुर्लक्ष करत या पदांची प्रतिष्ठा राखण्याचाच प्रयत्न केला असेही राजनाथ म्हणाले.