मुंबई : अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणासाठी सरकारकडून वर्गणीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याच उपक्रमावरून आता शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.
निलेश राणे म्हणाले कि, लाज सोडली शिवसेनेने. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, आज अयोध्येतील राममंदिर म्हणजे मालकी हक्काचा विषय बनू लागला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे व त्यावर संत महात्मे मंडळींची नेमणूक मोदी सरकारने केली. या नेमणुकाही शेवटी आपापल्या मर्जीतल्या लोकांच्या झाल्या. त्यावर टीका-टिपण्या झाल्या. आम्ही म्हणतो, ट्रस्टवर जे आले त्यांनी मंदिरनिर्माणाचे काम झपाट्याने पुढे न्यावे व मंदिराचा राजकीय विषय कायमचा बाद व्हावा. आधी मंदिर वहीं बनाएंगे व आता मंदिर आम्हीच बांधले असे दावे-प्रतिदावे कशासाठी? मग दोन्ही करसेवेत ज्या हजारो रामभक्तांचे बलिदान झाले, ते सर्व लोक अयोध्येतील मठ, मंदिरांत तूपरोटीचा प्रसाद खायला गेले होते की, शरयू नदीत सूर्यस्नानासाठी गेले होते? अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून बांधू असेही कधी ठरले नव्हते; पण लोकवर्गणीचा विषय साधा नाही. तो राजकीय आहे, असे शिवसेनेने सामनातून म्हंटले आहे.