प्रभाग क्र. 40 मधील नागरिकांचा सवाल
कात्रज – कात्रज प्रभाग क्रमांक 40 येथील मोरेबाग भागातील सावंत विहार, माणिक मोतीसह एकूण 12 सोसायट्या आणि परिसरात तीन ते चार महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पाणी कमी दाबाने आणि कमी वेळ येत आहे. यामुळे सोसायट्यांना अनेकदा टॅंकर मागवावे लागत आहेत.
प्रत्येक सोसायटीचे पाणी टॅंकरचे बिल काही हजारांच्या पुढे गेले आहे. हे बिल आता महापालिका देणार का? असा सवाल येथील नागरिकांकडून करण्यात आला आहे. पाणीटंचाईबाबत महापालिकेकडे तोंडी तसेच लेखी निवेदनाद्वारे तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर दोन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र, नंतर परिस्थिती पुन्हा जशास तशी होते. गेल्या काही दिवसांमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्याने सोसायट्यांना पाण्याचे टॅंकर मागवावे लागत आहेत. पाणीपुरवठा कर्मचारी काम चुकारपणा करीत असल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप जगताप यांचे म्हणणे आहे.
कात्रज परिसरातील मोरे बाग भागांमध्ये सोसायट्यांच्या पाइपलाइनचे काम सुरू केले आहे. पीएमसीच्या पाइपलाइनला जोडण्यात आलेल्या सोसायट्यांच्या खासगी पाइपलाइन गंजल्याने तसेच त्यामध्ये कचरा साचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधीत सोसायट्यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– राहुल सोरटे, उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, मनपा