नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांवरून मोठा वाद निर्माण झाला असून या विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. विविध राज्यांतून दिल्लीकडे निघालेले शेतकऱ्यांनी राजधानीत प्रवेश मिळत नसल्याने सीमांवर ठिय्या मांडला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नसल्याने आज आंदोलनकर्त्यांनी भारत बंदची ( Bharat Bandh ) हाक दिली आहे.
भारत बंदच्या ( Bharat Bandh ) हाकेला विविध राज्यांमध्ये प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या बंदनंतर सरकारसोबत उद्या शेतकरी नेते सहाव्यांदा चर्चा करतील. मात्र त्यापूर्वीच अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे ( amit shah to meet farmer leaders ). त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
शहा यांनी शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली असून, सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. सकाळी अमित शहा यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ही बैठक अनौपचारिक असणार आहे. या बैठकीत १३ सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.