मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथील घोडनदीवरील पुणे-नाशिक रस्त्यावर ब्रिटिशकालीन पुलावर रविवार (दि. 29) रात्री दुधाचा टॅंकर बंद पडल्यामुळे आणि वर्पेमळा हद्दीनजीक नवीन रस्त्याच्या तोंडाशी एक टेम्पो बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रात्री अकरा वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कळंबच्या पुलावर नेहमीच कोणती ना कोणती घटना घडली तर फार मोठी वाहतूक कोंडी होत असते. रविवारी (दि. 29) एकाच दिवशी दुधाचा टॅंकर आणि टेम्पो बंद पडल्याच्या दोन घटना रात्री घडल्याने जवळपास पाच ते सहा तास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे येथून जाणारे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना पायी चालणे मुश्कील झाले होते. दुचाकीस्वारसुद्धा तासन् तास या वाहनांच्या गर्दीमध्ये अडकून पडले होते.
कळंब वर्पेमळा हद्दीतील बाह्यवळण रस्त्याचे काम, तसेच पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे बायपासचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. याबरोबरच कळंब नदीवर होणाऱ्या नवीन पुलाचे काम अजूनही सुरू झालेले नाही, त्यामुळे कळंबच्या पुलावर एखादी घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी ही बाब नित्याचीच आहे.
आठवड्यातून एकदा तरी वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. ही वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस जवान राजेंद्र हिले, अविनाश लोखंडे आणि इतर यांनी केले.
रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. पुणे-नाशिक बाह्यवळण, कळंब घोडनदीवरील नवीन पूल, तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम प्रशासनाने पुढाकार घेऊन मार्गी लावावे, अशी मागणी कळंब ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.