जळोची -पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होऊन महिना होत आहे. जिल्ह्यात 10 सहकारी आणि 6 खासगी कारखाने आहेत. या कारखान्यांपुढे 140 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 16 कारखान्यांनी साधारण 25 लाख टन गाळप पूर्ण केले आहे; मात्र मागील काही दिवसांपासून थंडी कमी झाल्याने साखर उताऱ्यात दीड टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखान्याने तर गाळपात बारामती ऍग्रोने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, नीरा भीमा, पराग ऍग्रो, श्रीनाथ म्हस्कोबा या कारखान्यांनी दीड लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सतावत आहे. काही कारखान्यावर ऊसतोडणी मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळे बैलगाडीतून ऊसाची वाहतूक कमी होत आहे. कमी टोळ्या आल्याने कारखान्याकडून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरु आहे.
ऊसतोडणी मजुरांना पर्याय देण्यासाठी कारखाने स्थानिक शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशिन उपलब्ध करुन देत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान कारखानदारीवर अवलंबून असल्याने एकरकमी एफआरपी देण्याची मागणी सभासद शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे महिना होऊनही कारखानदारांकडून निर्णय होत नसल्याने चालू हंगामाच्या एफआरपीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
एफआरपीकडे कारखाने लक्ष देणार का….
मागील हंगामातील अंतिम भावाचा विषय संपला असला तरीही चालू हंगामातील एफआरपीबाबत कारखानदारांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन एक महिना होत आहे. एकरकमी रक्कम द्यायची का 80- 20 चा फॉर्म्युला वापरायचा, यावर कारखानदारांमध्ये विचार विनिमय सुरू असल्याचे समजते आहे.