नवी दिल्ली – सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना गुंतवणुकदारांचे 62 हजार 600 कोटी रूपये त्वरीत भरण्यास सांगावे अन्यथा त्यांचा पॅरोल रद्द करून त्यांना पुन्हा तुरूंगात पाठवण्यात यावे अशी मागणी करणारी एक याचिका सेबीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
सहारा उद्योग समुहावरील हे देणे आठ वर्षांपुर्वी 25 हजार 700 कोटींचे होते त्यावरील व्याज धरून ही रक्कम आता 62 हजार 600 कोटी इतकी झाली आहे. ही रक्कम जमा करण्याचा आदेश कोर्टाने त्यांना या आधीच दिला आहे.
सहारा उद्योग समुहाने कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे ही रक्कम उभी केली असून त्यांनी ती गुंतवणुकादारांना त्वरीत परत करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सन 2012 सालीच दिला होता. पण त्या आदेशाची त्यांनी पुर्तता केली नाही म्हणून त्यांना कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर सध्या ते पॅरोलवर बाहेर आले आहेत.
दरम्यान सहारा कंपनीने सेबीचा दावा अमान्य केला आहे. त्यांनी म्हटले आहे की सेबीने या कर्ज रकमेवर 15 टक्के इतके व्याज लावले असून ते अवास्तव आहे आम्ही कर्जदारांची मुळ रक्कम या आधीच दिली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.