विद्यार्थीच नसतील तर? शाळा व्यवस्थापनासमोरही पेच
पुणे – दिवाळीनंतर आता करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच चार दिवसांनी नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहे. त्यामुळे शाळेत मुलांना पाठविण्यावरून पालकच संदिग्ध भूमिकेत आहेत, अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठवायाचे, अशी चिंता पालकांना भेडसावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा (दि. 23) सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शिक्षणसंस्थांना शाळा सुरू करावी लागणार आहेत. यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. शाळेत मुलांना उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. लेखी संमती देताना पालकच संभ्रम असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करताना शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत शाळा सुरू करणे जोखमीची आहे. मात्र, आवश्यक ती काळजी घेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू करण्यास काहीच अडचण नाही. त्यादृष्टीने पालकांना विश्वासात घेण्यासाठी शिक्षणसंस्थांनी पावले उचलली आहेत. मात्र, पालकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे तूर्तास दिसून येत आहे. विद्यार्थी येत नसतील, तर शाळा कशी सुरू करायची, असा प्रश्न शिक्षणसंस्थांपुढे निर्माण झाला आहे.
दिवाळीत झालेल्या गर्दीचे परिणाम म्हणून करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे, अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकांपुढे आहे. राज्य सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अध्यापन-अध्ययन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, सद्यस्थितीत करोनाचे पूर्ण संकट टळण्यानंतरच मुलांना शाळेत पाठविणे योग्य राहील. त्यामुळे शाळेने ऑनलाइन शिक्षणावर भर द्यावा, अशी अपेक्षा शिवाजी जाधव यांनी पालकांच्यावतीने व्यक्त केली आहे.
सध्या, आम्ही सर्व पालकांच्या संपर्कात आहोत. मुलांना शाळेत पाठविण्यावरून पालकांमध्ये भिती आहे. शाळेत पाठवायचे की नाही, यावरून पालकांमध्ये शंका आहेत. त्यामुळे पालकांची काय भूमिका आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ.
– शरद कुंटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी